द्रोणागिरी
#द्रोणागिरी लहानपणा पासूनच एक गुढरम्य ओढ असलेला हा डोंगर. मावळतीला जाणारा सूर्य नेहमीच याच्या आड होताना पाहत आलो आहे. पावसाळ्यात पावसाची आलेली सर हया डोंगराला ओलांडून पुढे सरकली की हा दिसेनासा व्हायचा किंवा धुरकट,अस्पष्ट होत जायचा.पण त्यावरूनच आता थोडयाच वेळात पाऊस आपल्यापर्यंत पोहोचणार हे सहज लक्षात येत असे त्यामुळे वेळीच धाव मारून घर गाठणे शक्य होत असे.
हा डोंगर गूढ वाटण्याचे एक कारण म्हणजे दिवसा जेव्हा हवा संथ वाहत असेल तेव्हा डोंगराच्या वर लक्ष वेधून घेणारा धुराचा मोठ्ठा पट्टा आणि रात्रीच्या अंधारात आकाश उजळवून टाकणारा तांबडा-पिवळा प्रकाश हे होते. हळूहळू जसे मोठे होत गेलो तसे कुणाकडून तरी समजले की मागच्या बाजूला (खरंतर उत्तरेकडे) ONGC कंपनीचा प्रोजेक्ट आहे आहे त्याच्या चिमण्यांमधून तो धूर आणि आग बाहेर पडते. तेव्हा लहानपणी कधीतरी डोंगराच्या पलिकडे जाऊन पाहूया असे वाटायचे. तेव्हा आपण त्याच्या अगदी शेजारी रहायला जाऊ असे कधी वाटले नव्हते.
द्रोणागिरी डोंगराबाबत गुढ वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण होते, ते म्हणजे या डोंगराबाबत ऐकत आलेल्या दंतकथा. नावावरूनच हा डोंगर अगदी रामायणाशी आपला संदर्भ जोडत असल्यानेच काही लोक असे सांगत की, महाबली हनुमान जेव्हा मुर्छा येउन पडलेल्या लक्ष्मणासाठी हिमालयातील संजिवनी असलेला द्रोणागिरी पर्वत घेउन लंकेला जात होता तेव्हा त्याचा एक तुकडा खाली पडला तोच हा द्रोणागिरी पर्वत! आणि याच दंतकथेला जोडून तयार झालेली दुसरी एक अशीच वंदता अशी आहे की, हा मूळ द्रोणागिरी पर्वताचाच तुकडा असल्याने या डोंगरावरही कुणाला माहीत नाही परंतू संजिवनी वनस्पती आहे. या वंदतेवर विश्वास बसावा म्हणून काही लोक असे सांगतात की,
एकदा एक कोळीण (या डोंगराच्या पायथ्याशी करंजा नावाचे कोळयांचे गाव व बंदर आहे) मासे विकायला या डोंगराच्या पायवाटेने जात असताना माशांवर घोंगावणा-या माशा हाकलण्यासाठी तिने एक झुडपाची फांदी मोडून त्याने ती चालताचालता डोक्यावरच्या मच्छीच्या टोपल्यावरून माशा हाकलायला लागली. काही अंतर पुढे गेल्यावर तिच्या असे लक्षात आले की टोपल्यातले सर्व मासे जिवंत होऊन उडया मारायला लागले.तिने फांदी फेकून दिली आणि मासे सांभाळू लागली. मासे जिवंत होण्याचे कारण ती फांदी म्हणे संजीवनीची होती. पण नंतर शोध घेऊनही ते झुडूप कोणाला सापडले नाही.
तर असा हा द्रोणागिरी डोंगर म्हणूनच माहित होता. पण तेथे एक किल्ला आहे हे अगदी पाचसहा वर्षापूर्वीही माहीत नव्हते.नंतर whatsapमेसेजमधून किल्ल्याची माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे त्याचेअवशेष माझ्या बेडरूम व किचनच्या खिडकीतून दिसतात.तेव्हा मात्र तो किल्ला आहे हेच माहीत नव्हते . पण दुर्ग मावळा परिवारातर्फे या किल्यावर राबवलेल्या गडस्वच्छता मोहिमांमुळे किल्ला पहायला जावेसे वाटत होते. आमचा मित्र चेतन गावंड हा दुर्गमावळा परिवाराच्या मोहिमांमध्ये सहभागी होत असे त्याला तसे सांगितले. तो ही नित्यनेमाने प्रत्येक मोहिमेच्यावेळी मेसेज पाठवून यायला सांगत होता. पण मी भलताच बिझी(?😜) असल्याने मुहूर्त सापडत नव्हता.
पण अचानक महेंद्र गावंड चेतनसोबत किल्लयावर गेल्याचे पाहिल्यावर पुन्हा एकदा जायचे ठरले. चेतनने आजचा मंगळवार(दि.1.12.2020 चा दिवस सांगितला आणि तो मुहुर्त मी,माझा मुलगा दर्श ,महेंद्र गावंड आणि किरण गावंड या तिघांनी गाठला. अनपेक्षितपणे चेतनने मात्र कात्रजचा घाट दाखवला.
खूप छान अनुभव होता..... धन्यवाद महेंद्र,किरण आणि चेतनला सुद्धा.....(किल्ल्यावरील भटकंतीबाबत सविस्तर पुढे लिहेन आज एवढयावरच थांबतो🙏🙏)
प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण- रायगड
मो.8097876540
























