Monday, April 6, 2020

*इंडियाना जोश आणि वैज्ञानिक अंधश्रद्धा*
     
 वैज्ञानिक अंधश्रद्धा ???? विज्ञान आणि अंधश्रद्धा हे गणित कुणाच्याही पचनी पडणे तसे अवघडच. विज्ञान अंधश्रद्धा दूर करते, मग वैज्ञानिक अंधश्रद्धा खरंच असू शकतात का ?  हा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. पण काही गोष्टींचा विचार केला तर काही महाभाग असे आहेत की हे पवित्र(?) कर्म अगदी इमानेइतबारे करत आहेत . अर्थात ते या सगळ्या अफवा आहेत, अफवा आणि अंधश्रद्धा वेगवेगळ्या बाबी आहेत अशी मल्लिनाथी करू शकतात.परंतु अशा अफवांमधूनच पुढे अंधश्रद्धा दृढ होत असतात हे सर्वश्रृत आहेच. हे लोक इतर लोक कसे बुरसटलेल्या विचारांचे आणि आम्हीच कसे अत्याधुनिक विचारसरणीचे असा मुखवटा घालून फिरणारे आहेत . भारतीय संस्कृती खूप जुनी आहे. परंतु ती जुनी आहे म्हणून टाकाऊ,मागासलेली आहे असा यांचा जावईशोध त्यांचा त्यांनीच लावलेला असतो.
         सन 1979 चा मे महिना आणि जुलै महिन्याच्या पूर्वार्धात अशीच एक अफवा पसरली होती. आकाशातून आपल्यावर काहीतरी पडणार, आपण मरून जाऊ असे सगळया लोकांना वाटू लागले होते. खरंतर ते काहीतरी म्हणजे ' *स्कायलॅब* ' होती जी काम करेनाशी झाल्याने समुद्रात पाडून टाकण्याचे प्रयत्न सुरु केले होते पण देशातील सर्वांना ते 78 टनाचे धूड आपल्याच गावावर पडणार,सगळे मरून जाणार असे वाटत होते. सगळयांनी मरणारच आहोत म्हणून घरात पाळलेल्या कोंबडया कापून खाल्ल्या (त्याकाळी आतासारख्या दर रविवारी,बुधवारी चिकन-मटन खात नसत.काही खास कारणालाच कोंबडे कापत). शेवटी 11 जुलै 1979 स्कायलॅबचा काही भाग हिंदी महासागरात व काही भाग आॅस्ट्रेलियाच्या जवळ पडल्याची बातमी रेडिओवर ऐकली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर 1998 साली अशीच *मोठी लाट येणार* सर्व वाहून जाणार... अशी आवई उठली, पुन्हा एकदा लोकांनी कोंबडया कापून खाल्ल्या पण तेव्हाही ते जिवंत राहिले.
    *विज्ञानाने पसरवलेली सर्वात मोठी अफवा होती ती Y2K बाबतची*. Y2K म्हणजे सन 2000. दुसरे सहस्रक सुरू होताच म्हणे सर्व कंप्युटर बिघडतील 00 वर्षामुळे बॅकिंग क्षेत्र गडबडेल, क्षेपणास्त्राचे टाईम बिघडले तर आपोआप लाँच होऊन अनर्थ होईल,  एकंदरीत जग संकटात येईल असे सांगितले जात होते. त्यावरही तोडगा निघाला . जगाने 2000 साल पाहून आज 20 वर्षे पालटली. पुढे 2012 साल पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यावर आधारित सिनेमाही आला.  त्यातील ग्राफिक्स व स्पेशल इफेक्ट्सने तर जग हादरून गेले. पण ते वर्षही सुखनैव पार पडले.यादरम्यान मोबाईल फोन आले. निरोप देण्याघेण्याचे काम करता करता या मोबाईलने घडयाळ, ट्रांझिस्टर, कॅमेरा, आलार्म क्लाॅक अशा अनेक गॅझेटसना आपल्यात सामावून घेउन टाकले. फेसबुक,ट्विटर,वाॅट्स अप, ईन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाने जगाचे भावविश्व व्यापून टाकले. मग सुरू झाले अंधश्रद्धा पसरवणारे मेसेज. अमुक मेसेज,अमुक जणांना पाठवा असे पारंपारिक अंधश्रद्धाळू मेसेज पाठवता पाठवता *"आज रात्री मोबाईल दूर ठेवा, अमक्या वेळी काॅस्मिक किरणे बाहेर पडतील.."* असे वैज्ञानिक अंधश्रद्धा पसरवणारे मेसेज सुरू झाले. अशातच मोदी सरकार सत्तेत आले आणि मग काय पाहता. सत्ताधारी आणि विरोधक यांचे आयटी सेल कार्यरत झाले.  अंधभक्त, 40 पैसेवाले, चाटू अशी कमेकांची संभावना करत भारतीय संस्कृती आणि विज्ञान या दोहोंचेही अक्षरशः वाभाडे काढणारे, एकमेकांच्या मताला छेद देणारे मेसेज सुरू झाले. कोणतेही,कसेही लाॅजिक लावून फक्त आणि फक्त विरोधाला विरोध करत अंधश्रद्धा पोसली- वाढवली जाऊ लागली. जुन्या अंधश्रद्धा एकवेळ परवडल्या पण विज्ञानाचे नाव घेऊन अकलेचे तारे तोडणा-यांना कसे रोखणार??
     आजच्या घडीला तर टाळया,थाळया आणि दिव्यांच्या प्रकाशामुळे तर या दोन्ही बाजूंच्या दिवटयांनी तर अफवा,अंधश्रद्धांचे भडके उडवायला सुरवात केली आहे. साध्या टाळया वाजवायला सांगितल्या तर त्यावर अफलातून शोध लावत त्याद्वारे कायकाय होऊ शकते हे सांगणारे संस्कृतीवादी आणि हे कसे चुकीचे आहे हे सांगणारे तथाकथित बुद्धीवादी यांनी जो हैदोस समाजमाध्यमांवर घातला त्यातून ज्या पोलिस,डाॅक्टर,नर्स यांचे आभार प्रदर्शन राहिले दूरच ते राहिले बाजूला आणि हयांच्याच कोंबडझुंजी सुरू झाल्या.  थाळया फोडणे, सिलेंडर बडवणे, संचारबंदीचे उल्लंघन करून मोर्चे काढणे असले प्रकार घडले. हे कमी की काय म्हणून पुन्हा एकदा मोदीजींनी आपण सगळे एक आहोत हे दाखवण्यासाठी लाइट बंद करून दिवे, मोबाईल टॉर्च पेटवून एकमेकांना आपण एकत्र आल्याचे समाधान देण्याचा प्रस्ताव मांडला आणि मग काय पाहता... दोन्ही बाजूचे संशोधक धडाधड पाहिजे तसे खोटयाला ख-याचा मुलामा देऊन आपले घोडे दामटू लागला.  कुणी म्हणे अमुक एवढे तापमान होईल, तर कुणी म्हणे पाॅवर ग्रीड फेल होऊन देश काही दिवसांसाठी अंधारात जाईल...
        शेवटी काहीच झाले नाही . यातून दिसून आला तो आपल्या भारतीयांचा 'जोश'  आणि अतिउत्साह. ज्याला आपण इंडियाना जोन्सच्या तालावर "इंडियाना जोश" म्हणू शकतो. भारतावर राज्य करायचे असेल तर हया जोश चा वापर ज्याला करता आला तो देशाचे काहीही भले न करताही देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवू शकतो हे कित्येक वेळा दिसून आले आहे. हा जोश वाढविण्यासाठी कोणी धर्म नावाची कफूची गोळी देतो,तर कोणी देशाच्या, राज्यांच्या सीमा धगधगत्या ठेवून आपली पोळी भाजून घेत असतो. सर्वसामान्य मात्र फक्त आणि फक्त जळतच राहतो.  तो कधी बाॅम्बस्फोटात मरतो,कधी सैनिक म्हणून सीमेवर मरतो,कधी नोटबंदीच्या रांगेत मरतो , तर कधी आपले चंबूगबाळ सावरत आपले गाव गाठण्यासाठी उपाशीपोटी बायकापोरांसकट रस्तोरस्ती भटकत,धडपडत ऊर फुटेस्तोवर चालत राहतो. पण मरतो तोच. ज्याने हा जोश दाखवलेला असतो तोच.  *इंडिया नेहमीच सुरक्षित असतो खतरे में नेहमीच भारत असतो.*
     पण तरीही आमचा हा इंडियाना जोश कधीच कमी होणार नाही. हे कोरोनाचे संकट टळू दे, मग पुन्हा आम्ही आमचे झेंडे घेऊन फडकवायला तयारच आहोत. खरं ना?????

प्रविण म्हात्रे
पिरकोन, उरण,रायगड

No comments:

Post a Comment