Sunday, April 26, 2020

शिक्षणपद्धती बदलाची गरज??? 



खरंतर आताच काही आखाडे मांडणे किंवा काही उपाययोजनांवर चर्चा करणे थोडे घाईचे,  कदाचित अवास्तव वाटेल कारण देशातील कोरोना संकट अजूनही क्षितीजावर घोंगावणा-या वादळासारखे आहे.  वारे वहायला सुरुवात झाली आहेच,  सर्व विस्कळीत झालेलेच आहे.  पण त्याचा गाभा नेमका कुठे आहे आणि त्याची विनाशक शक्ती किती आहे,  ते किती भयंकर असू शकेल, जग , पर्यायाने आपण यातून कधी सावरू शकू याचा फक्त अंदाजच घेऊ शकतो.निश्चितता नाहीच . लाॅकडाऊन किती दिवसांपर्यंत अजून सुरू ठेवावे लागणार आहे , सर्व जगरहाटी सुरळीतपणे कधी सुरू होईल आणि त्यासोबतच मार्चच्या मध्यापासून बंद झालेल्या शाळा पुन्हा कधी सुरू होणार हे जिथे सांगता येणे अशक्यप्राय आहे.तेथे पुढचे निर्णय कसे घेता येतील. 3 मे पर्यंत लाॅकडाऊन आहेच. म्हणजेच 1 मे त्यातच जाईल.  अधिकृतपणे यादिवशी या शैक्षणिक वर्षाची सांगता होईल. पुढील शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू होईल का हे आजच सांगणे धाडसाचे ठरेल.परंतु त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात तरी व्हायलाच हवी. शाळा किती दिवस बंद ठेवता येतील ? सुरू केल्याच तरी कोणती खबरदारी घ्यावी लागेल ? ...महत्त्वाचे म्हणजे पूर्वपरंपरांगत शिक्षणपद्धतीच अवलंबून चालेल की काही वेगळे मार्ग शोधावे आणि चोखाळावे लागतील का याबाबत थोडे तरी विचारमंथन होणे आवश्यक आहे.
आपणही आपल्या मगदूराप्रमाणे थोडासा विचार करून पाहू या की काय करता येईल. कोणती शिक्षणाची पद्धत अबलंबता येईल ते!
          1) ONLINE STUDY(इंटरनेट द्वारे)  -
   सध्या शिकण्या- शिकवण्याच्या परंपरागत पद्धतीला सक्षम पर्याय म्हटला की online study चा विचार सर्वात प्रथम केला जातो. त्याला सुरूवातही झाली आहे. आपापल्या जागी बसून शिक्षक आणि विद्यार्थी अध्ययन-अध्यापन करत आहेत असे एक चित्र पुढे येऊ पाहत आहे. आपण एकविसाव्या शतकातील विसाव्या दशकात येऊन ठेपलेलो आहोत त्यामुळे एवढी मजल तरी मारणे अपेक्षितच आहे. ......पण !!! , हा पण च या मार्गावरील सर्वात मोठा अडथळा आहे. कारण घरोघरी मोबाईल पोहोचला आहे, अँड्रॉइड फोन ही मोठया प्रमाणावर वापरले जात आहेत, whatsapp,  facebook सारखे सोशल मीडियावरही गर्दी वाढत आहे पण आजही महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये मोबाईलची रेंज नाही, टाॅवर नाही, आहे तोही सक्षम नाही अशी अवस्था आहे. पालकाकडे मोबाईल आहे पण तो आपल्या पाल्याला वापरण्यासाठी किती वेळ देईल हे कोडेच आहे. ब-याच जणांची तर मानसिकताही अशी विचित्र आहे की,  एकवेळ आपले काम उरकून घेण्यासाठी मुलाला गेम खेळायला मोबाईल देतील. त्यासाठी वेगवेगळे हिंसक गेम डाऊनलोड करून देतील पण एखादे शैक्षणिक अॅप मग ते Diksha सारखे उपयुक्त का असेना. ते मात्र कोणी डाऊनलोड करायला,  लिंक ओपन करायला तयार होत नाहीत. दुसरा एक धोका आहे तो म्हणजे मुलांचे मोबाईल अॅडिक्शन वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मोबाईलवर पाठयांश समजून घेणे, तो सोडवणे, परत त्याचा प्रतिसाद देणे यासाठी किमान तीन चार तास (काही जाणकार हा वेळ सहा सात तासांचा मानतात) मोबाईल स्क्रीनला डोळे लावून बसणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पण सध्या तरी हा एक पर्याय म्हणून स्विकारायला हरकत नसावी.
        2) ODD-EVEN system (सम विषम पद्धत)
   आजच्या घडीला तरी एक हास्यास्पद कल्पना वाटावी अशी ही पद्धत आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री मान. केजरीवाल यांनी वाहनांसाठी ही पद्धत अवलंबली तेव्हाही लोक हसलेच होते. पण कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी गर्दी कमी करून सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे.  त्यामुळे शाळांमधील बालके एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर रहाणे आवश्यक आहे. यामध्ये दोन पर्याय असू शकतात.  पहिला साधारणतः सगळयांना पचनी पडेल असा पर्याय म्हणजे दैनिक दोन सत्रात शाळा भरवणे.इथे इयत्तांची विभागणी असेल . काही इयत्ता सकाळ सत्रात तर काही दुपार सत्रात भरवणे. जेणेकरून विद्यार्थी संख्या विभागली जाऊन सोशल डिस्टंन्सिंग राखता येईल. दुसरा पर्याय अजून कोणी अंमलात आणलेला नाही परंतु तो जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये राबवता येऊ शकतो .एका वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन विभाग करून दिवसाआड शाळेत बोलावणे. शाळेत शिक्षकांनी शिकवणे व त्याचे दृढीकरण व स्वाध्याय सोडविण्याचे काम पालकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी घरात राहून करणे, त्या दिवशी दुसरा गट शाळेत येईल. असे नियोजन असेल. या पद्धतीला मान्यता मिळणे तसे कठिणच आहे कारण येथे पालकांचे सहकार्य खूप महत्त्वाचे आणि निर्णायक असू शकते.  तसेच नोकरदार पालकांसाठी दिवसाआड मुले घरी असणे हे खूपच समस्या निर्माण करणारे ठरेल. तसेच शिक्षकांनाही दुप्पट काम करावे लागेल. शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणे व घरी असलेल्यांच्या संपर्कात राहून त्यांनाही आवश्यक ते मार्गदर्शन करणे ,आधीच्या दिवसाच्या गृहपाठाचा काटेकोर आढावा घेणे आणि सोबतच चालू दिवस व पुढच्या दिवशीच्या अभ्यासाचे नियोजन अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागेल.
       थोडी मेहनत आणि थोडी जबाबदारी स्वीकारली आणि या दोन्ही मधला सुवर्णमध्य साधला तर या कोरोना संकटातून बाहेर पडेपर्यंत शिक्षणप्रक्रिया थांबणार नाही आणि पुनश्च जोमाने काम करणे शक्‍य होईल.सर्व पुर्ववत झाल्यानंतर मग नियमित अभ्यास पद्धती सुरू करता येईलच तोपर्यंत वर्तुळाकार चक्रात फिरण्याऐवजी कधीतरी ते भेदून बाहेर पडण्याची धमक दाखवली तर  हे ही अशक्य नाही.

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो नं 8097876540

No comments:

Post a Comment