Monday, December 30, 2019


झटपट 'तापोटी' पेटवा

आला थंडीचा महिना
झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला
     
मधाचं बोट कुणी चाटवा...  
  
          तुम्ही जर दादा कोंडके यांचे चाहते असाल (तसा उभा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे म्हणा) तर थोडी जरी थंडी पडली की हे गाणे आठवणार नाही असे होऊच शकत नाही. जरा कुठे गारठा वाढायला लागला की हे गाणे आठवणा-यांची संख्याही वाढायला लागते. याच शेकोटीला उरणच्या काही भागात 'तापोटी' म्हणतात. वास्तविक पाहता ही तापोटी किंवा शेकोटी माहित नाही असा कुणी असणे शक्यच नाही , परंतु बहुतेक वेळा ही गरज म्हणून पेटवली जाणारी असल्याने ती तेवढयापुरतीच लक्षात राहणारी असते तिच्याशी संबंधित काही आठवणी असण्याची तशी शक्यता नसल्यातच जमा असते. खरंच थंडीचा कडाका वाढला म्हणून आजूबाजूचा ओलसर कचरा गोळा करून पेटवलेली,  जुन्या टायरची शेकोटी पेटवून शेकत बसलेले असताना काळकुट्ट धूर निघणारी आणि तो चुकून श्वासाबरोबर जोराने आत ओढला गेला तर दम कोंडून झालेली घुसमट आठवण्याची बाब आहे का ???? .तसेच आग पेटत रहावी म्हणून प्लास्टिकची पिशवी टाकून आग पेटवत ठेवली पण अनवधानाने त्याच वितळलेल्या प्लास्टिकवर नेमका पाय पडल्याने आलेले फोड कुणाला आठवावेसे वाटणार ?? .. गरज आणि नाईलाजाने पेटत्या आगीजवळ बसून हात-पाय शेकून घेणे एवढीच तिची ओळख असते. बाकी तिच्यात काहीच विशेष वाटत नाही....पण या तापोटीच्या ख-या आठवणी म्हणजे काही फक्त ती गवतपेंढा टाकून पेटवलेली आग नसते,तर  तीस-पस्तीस वर्षापूर्वीच्या काळातील ग्रामीण जीवनाचे एक वेगळया प्रकारचे दर्शन त्यातून अप्रत्यक्षपणे घडत असते .त्यावेळी तापोटी ही थंडी आहे म्हणून नाही तर आनंद मिळवण्यासाठी पेटवली जायची .
        आज घरोघरी गॅस आहेत. पूर्वीची "घरोघरी मातीच्या चुली..." ही म्हण आता कालबाह्य झाली असली तरी .दोन-तीन दशकांपूर्वी खरोखरच घरोघरी मातीच्याच चुली होत्या. चूल म्हटले की त्यासाठी सरपण ,लाकूडफाटा आवश्यक आहेच. ते सरपण आणणे हे काम घरातील स्त्रीयांनाच करावे लागायचे. ते काम वाटते तितके सोपे नव्हते ,कारण तात्पुरता लाकूडफाटा गावाशेजारच्या माळरान किंवा कुरणांतून जमवता यायचा. मात्र वर्षभराच्या सरपणाची सोय करण्यासाठी मात्र दूरच्या डोंगरावरील जंगलात जावे लागायचे.  जवळपास आठ-नऊ किलोमीटरचे हे अंतर पायी चालत जायचे जंगलात लाकडे तोडायची. त्याची मोळी बांधायची आणि परत तेवढेच अंतर परत यायचे हे काही साधेसोपे काम नव्हते. तरीही त्याचे छान नियोजन त्यांनी केलेले असायचे सगळ्याजणी पहाटे उठून स्वत:साठी व घरातल्यांसाठी भाक-या, कालवण बनवून एकत्रितपणे निघत.काळोखातच  सहा-सात किलोमीटर अंतर कापून उजेड पडण्यास सुरुवात झाली की नेहमीच्या ठिकाणी पाण्याची सोय पाहून थांबून भाकरी खाऊन घेत. साधारणतः दिसू शकेल एवढा उजेड पडला की मग वेगवेगळ्या गटाने पुढे डोंगरावरील झाडी झुडपांत घुसून जाळण्या योग्य अशा झाडांची लाकडे तोडून जंगलातील वेल किंवा झाडांच्या सालींची दोरी वळून लाकडांची मोळी बांधून परत ठरलेल्या ठिकाणी येऊन इतरजणींची वाट पहात आपल्या सोबतच्या सगळयाजणी जमल्यानंतर मोळया उचलून घरचा रस्ता धरत. पुन्हा तेवढेच अंतर चालत निघायचे तेही एवढे थकून डोक्यावर मोळीचे वजन घेऊन. यात थोडी आनंदाची बाब एवढीच असायची की, परत येताना घरातील दुसरी कोणीतरी व्यक्ती अर्ध्या रस्त्यात मदतीला येत असे. डोक्यावरचा भार जरी कमी झाला तरी परत तेवढे अंतर पायीच चालावे लागत असे. त्याबाबतीत कोणतीही पर्यायी सोय नव्हती. वातावरणाच्या दृष्टीने हे थकवणारे काम हिवाळयातच करावे लागे, कारण थंड वातावरणात ते सुसहय व्हायचे. त्याचबरोबर पावसाळा नुकताच संपून गेलेला असल्याने झाडे झुडपेही वाढून पाने गळायला सुरवात झालेली असायची. त्यामुळे जास्त उपलब्धता आणि तोडण्यास सोपी,  झटपट लाकडे जमवणे शक्य होत असे.
         हिवाळा सुरू झाला की घरातील आई, काकी, ताई या सरपण आणण्यासाठी पहाटे लवकर उठल्या की मग लहान मुलांनाही जाग यायची.तो काळ असा होता की कुणाजवळ स्वेटर असणे , घरात चादरी असणे हे चैनीचेच आहे असे वाटायचे. मोठया माणसांसाठी जास्तीत जास्त एखादा वर्षानुवर्षे वापरत आलेला भोकं पडलेला मफलर असायचा. अंथरुण आणि पांघरुण दोन्हीसाठी आईचे लुगडेच असायचे. त्यामुळे रात्रभर आईच्या ऊबदार कुशीत निजलेली मुले थंडी आणि घरात आईची कामाची चाललेली खुडबूड यामुळे आईसोबतच उठून आईने पेटवलेल्या चुलीजवळ येऊन शेकत बसत.पण आईला मात्र कामाची घाई असल्याने तिला मुलांची मध्ये होणारी लुडबूड अडचणीची ठरायची.मग आई त्यांना घराशेजारी साठवून ठेवलेल्या भाताच्या पेंढयाच्या दोनचार गुंडया देउन तापोटी कर जा असे सांगून त्यांना बाहेर पिटाळत असे. खरेतर मुलांनाही तेच हवे असायचे, पण त्या दिवसांत शेतीची मळणीची कामे नुकतीच उरकलेली असल्याने घराशेजारी,घरावर,आजूबाजूला भाताच्या पिकाचा पेंढाच पेंढा असल्याने आग पेटवणे धोक्याचे असल्याने घरातील वडीलधारी माणसे तापोटी केल्यावर ओरडत असत.  आता मात्र आईनेच सांगितल्यामुळे त्यांचे भागून जात असे.मग काय लगेच सुरक्षित असा कोपरा शोधून पेंढा पसरवला जायचा.घरात जाऊन चुलीतील पेटते लाकुड सावकाशपणे उचलून आग सांभाळत बाहेर आणून आग पेटवायची.सावकाश थोडा थोडा करत पेंढा टाकून आग पेटवत ठेवायची. मस्त शेकत बसायचे.  हा आगीचा उजेड दिसल्यावर शेजारची मुलेसुद्धा उठून शेकायला येत. यावेळी मात्र तापोटी करणा-यातला मालक जागा व्हायचा. तो लगेच मालकी हक्क दाखवत येणाऱ्या प्रत्येक मुलाला आधी थोडातरी पेंढा आणायला सांगायचा.त्याने पेंढा आणल्याशिवाय त्याला जवळ घेतले जात नसे. तो जबरदस्तीने आलाच तरी त्याला दूर करणे, त्याच्या आणि शेकोटीच्या मध्ये उभे राहून ऊब मिळू न देणे असे चालायचे. कधी त्यांना धूर ज्या दिशेला जात असेल तिकडे उभे करणे किंवा चक्क हाताने धूर त्यांच्या दिशेने ढकलणे असे प्रकारही करत असत. बिचा-यांचे डोळे आधीच झोपेमुळे लाल झालेले असायचे त्यात धूर डोळ्यात गेल्याने डोळ्यांना पाण्याच्या धारा लागत.तो तापोटी पेटवणारा तिथला बाॅस असायचा. पेंढा कमी पडल्यावरही पेंढा आणायला तो इतरांनाच पिटाळून स्वत: शेकत बसायचा. असे जरी असले तरी सगळयांनाच शेकत बसायला मज्जा वाटायची. जर यातून आनंद मिळत नसता तर अंथरूण सोडून कोण कशाला घराबाहेर पडले असते.सकाळी सकाळी तापोटीजवळ बसून शेकायची गंमतच न्यारी.....पेटत्या तापोटी जवळ बसून मग 'कोंबडा-कोंबडा'  खेळाला सुरुवात होत असे. पेंढा पेटला आणि आगीचा लोळ वर उठला की सोबत पेटत्या काडयाही वर उडत याच पूर्ण जळून विझलेल्या काडयांना कोंबडा म्हणत .प्रत्येकजण आपापली वर उडालेली काडी निवडून 'माझा कोंबडा जास्त वर गेला,तुम्हाला हरवले...' असे ओरडत.खेळ म्हणावे असे काही नसले तरी मिळणारा आनंद काही वेगळाच असायचा.याच वेळी काही म्हातारी माणसे पण येउन शेकत बसत.ती मात्र हयाची बाॅसगिरी उडवून लावतच वर कुरकुर करत हळूहळू इतरांना बाजूला ढकलत मोक्याची जागा बळकावत.
     आजकाल स्वेटर , शाल व इतर वेगवेगळी साधने उपलब्ध झाली आहेत. भाताचा पेंढाही साठवून ठेवत नाहीत त्यामुळे तापोटी करणे शक्‍य नाही आणि तशी गरजही उरली नाही.उरल्यात त्या आठवणी.....
प्रविण म्हात्रे
पिरकोन -उरण-रायगड
मो. 8097876540
ईमेल pravin.g.mhatre@gmail.com
          

Friday, December 20, 2019


दीपवनी

आपल्या महाराष्ट्र राज्याला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि त्यापैकी साधारणतः 180 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्या रायगड जिल्ह्यात आहे. उरण,अलिबाग,मुरूड,म्हसळे,श्रीवर्धन हे तालुके किनारपट्टीवरचे आहेत. या तालुक्यात राहणारे बहुतेक लोक हे आगरी आणि कोळी समाजाचे आहेत. भरभरुन पडणारा पाऊस आणि त्यावर पिकणारे तांदळाचे पिक, किना-याला लागून असलेल्या खाडया आणि त्यात मिळणारे मासे... यांच्या सहज उपलब्धतेनुसारच या भागातील लोकांच्या दररोजच्या आहारात भात आणि मासे यांचा समावेश असणे म्हणजे काही विशेष नाही. पनवेलची खाडी,  धरमतरची खाडी, रोहयाची खाडी,  राजापूरची खाडी यांनी याभागातील सगळयाच लोकांच्या ताटात भात अन् माशांशिवाय दुसरे काही असूच शकत नाही याची  कायमस्वरूपी सोय करून ठेवलेली आहे. बरे या मासेमारीचे स्थळ-कालपरत्वे प्रकार तरी किती आहेत हे सांगणे देखील कठिण आहे. पावसाळ्यात सुरवातीला अंडी घालण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वर चढणा-या माशांची उधवण किंवा वलगण असूदे नाहीतर किना-यावर लांबलचक जाळे पसरून धरलेले वाणं असो. डोल लावून मासे धरने असो किंवा छोटे जाळे म्हणजेच आसूने मासेमारी करणे असो... या तालुक्यातील लोक या मासेमारीच्या परंपरागत कलेत अगदी निपुण आहेत. यातीलच एक वेगळा आणि थोडा अपरिचित प्रकार आहे,तो म्हणजे 'दीपवनी'.
     दीपवनी हा मासेमारीचा प्रकार जास्त परिचित नसण्याची कारणे अनेक आहेत. एकतर याप्रकारासाठी विशिष्ट नैसर्गिक अरुंद खाडी असावी लागते. त्याचप्रमाणे   थोडा संथ पण समुद्राकडून खाडीच्या वरच्या चिंचोळ्या भागाच्या दिशेने वाहणारा वारा, कमी थंडी ,ऊबदार वातावरण आणि संध्याकाळ व रात्र यांच्यामधल्या वेळात पूर्ण ओहोटी लागणे याचाच अर्थ सर्वसाधारणपणे शुद्ध पक्षातील षष्ठी ते अष्टमी अशी तिथी असणे आशा सर्व बाबी जुळून येणे आवश्यक असते. तसेच यासाठी किमान पाच-सहा माणसांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकत्रित, सुसूत्रतेने काम करणे गरजेचे असते. विशेषतः शेवटच्या क्षणी थकल्याने किंवा आळसाने जर एक दोघांनी दुर्लक्ष केले तर हाती काहीच पडत नाही.जवळजवळ चारपैकी एका फेरीत यश मिळते. तीनवेळा थोडक्यातच समाधान मानावे लागते.कधीकधी अगदी रिकाम्या हाताने हात हलवत परत फिरावे लागते.
         दीपवनीला आवश्यक योग्य वातावरण बहूदा माघ -फाल्गुन महिन्यात असल्याने या काळातच दीपवनीला जायचा बेत चतुर्थीलाच एखादयाच्या मनात घोळू लागतो. मग तो आपल्या काही साथीदारांना आपला बेत सांगतो .कोणकोण येणार याची चाचपणी झाली की मग आवश्यक असणारे साहित्य जमविले जाते. फारसे काही विशिष्ट सामान हवे असते असे नाही , पण तरीही प्रत्येकासाठी एक एक आसू व उजेडासाठी कंदील-बॅटरी यांची जमवाजमव केली जाते.  आसू म्हणजे बांबू वळवून त्याची एक गोल फ्रेम बनवलेली असते. दिसताना हा आकार मराठी चार (४) या अंकासारखा परंतु त्या चाराची गाठ खूप मोठी व वरचे दोन्ही हात अगदी छोटे असतील असा हा आकार असतो. त्यावर लहान विणीचे जाळे लावलेले असते.कोकणात साधारणतः प्रत्येक घरी ही आसू पूर्वी असायचीच.म्हणूनच ती सहज उपलब्ध होते. सोबतच उजेडाची पक्की सोय झाली की,  दुसर्‍या दिवशी एक दोघेजण संध्याकाळच्या वेळेत खाडीकडे सहजच रमतगमत फिरायला जाऊन भरती ओहोटीचा अंदाज घेऊन पुढील दिवशी पाण्याची स्थिती कशी असेल याचा आदमास घ्यायचे. त्या अंदाजाने त्यानंतरच्या दिवशी संध्याकाळी किती वाजता निघायचे याची निश्चित वेळ ठरवत असत.
         ज्या दिवशी दीपवनीला जायचे असेल त्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या आसूची डागडुजी(यालाच ग्रामीण भाषेत 'तांगलान-तुंगलान' म्हणतात) करून कुठे फाटलेले जाळे तांगलुन घेत. आसूचा गांरां म्हणजेच बांबूची फ्रेम मोडली वा सैल झाली नाही ना , जाळे सर्व बाजूंनी योग्यप्रकारे घट्ट बांधले आहे ना याची खातरजमा करून आपापली आयुधे जय्यत तयार ठेवत.  कंदील असेल तर त्यात राॅकेल भरून काच स्वच्छ पुसून साफ करणे ,पट्टीची वात योग्य लांबीची आहे किंवा नाही , नसेल तर किराणा दुकानातून ती विकत आणणे. ती कंदीलात भरणे ही कामे उरकून घेतली जात. संध्याकाळी सुर्य मावळतीकडे झुकू लागला की हे सगळे वीर आपापल्या आयुधांसह खाडीच्या मुखाशी समुद्राजवळ पोहोचत.  कधीकधी या सगळ्यां वीरांसोबत  माझ्यासारखा एखादा बाजारबुणगाही असायचा. जो प्रत्यक्ष या कामगिरीत सहभागी होऊन चिखलात उतरत नसे. पण बांधावर उभा राहून कंदील-बॅटरी सांभाळणे,  पकडलेले मासे जवळच्या पिशवीत भरणे किंवा त्यांचे कपडे वागविणे अशी कामे तो करत असे.  म्हणून त्याला 'वागव्या' असेच म्हणत. यावेळेपर्यंत ओहोटी लागायला सुरवात झाली असायची.पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आणि सूर्य मावळून अंधार पडायला सुरूवात झाली की ते पाण्यात उतरून आसूने मासे पकडत पकडत समुद्राच्या उलट दिशेने वरवर येत . ते सगळे एका रेषेत सर्व खाडीची रुंदी अडवून धरत, पाण्यात जोरजोराने खळबळ माजवत पुढेपुढे सरकत येत. जेणेकरून मासे घाबरून वरच्या दिशेने पळतील. यावेळी खरेतर कोणीही आपल्या जाळयात मासे मिळतात किंवा नाही याची काळजी न करता जास्तीत जास्त पाण्यात खळबळ माजवणे हे उद्दिष्ट ठेवूनच चालत असत. मिळालाच एखाददुसरा मासा तर तो बोनस समजून वागव्याच्या दिशेने भिरकावून देत आणि तोही चपळाईने तो मासा उचलून पिशवीत टाकत असे,कारण नंतर दीपवनी यशस्वी झाली नाही तर हेच मासे कालवणापुरते म्हणून आधार ठरत.
           हळूहळू रात्र चढायला सुरवात होई, भरतीचे पणीही कमीकमी होत जाई. कंदील धरणा-याने तो एव्हाना पेटवलेला असे.बॅटरी असेल तर मात्र गरजेपुरती चालू बंद करीत असे .छातीभर पाण्यात मासे पकडायची सुरवात केलेली असायची ती आता गुडघाभर पाण्यापर्यंत आलेली असायची. आता खाडीची रुंदीही कमी झालेली असल्याने अडकलेले मासे इकडेतिकडे उडया मारताना दिसू लागत. खरी मासे पकडायची संधी आता मिळू लागलेली असायची. हीच वेळ असायची ज्यात या मासेमारांचे कौशल्य पणाला लागणार असायचे. नीट एकमेकांच्या सहकार्याने आता माशांची वाट अडवून धरत, त्यांना खाली समुद्रात परत जाऊ न देता वरवर पळवणे हे कठीण काम आता सुरू झालेले असायचे. कमी पाण्यात अडकलेले मासेही जाळयात सहज मिळू लागत असतानाच ,त्यांना अडवून ठेवण्यासाठी लगेच पुन्हा जाळे पाण्यात मारावे लागत असल्याने जाळयात आलेला मासा पटकन पकडून पिशवीवाल्याकडे फेकून पुन्हा पाण्याकडे वळावे लागत असते. हे सर्व एकदम पाच सहा जण करत असल्याने पिशवी वागव्याचीही तारांबळ उडालेली असायची. टण् टण् उडया मारत माशांना पाण्यात पुन्हा जाऊ न देता पटापट पकडून पिशवीत टाकताना जी काही कसरत करावी लागे की, त्यालाही दमायला होई.त्यातच मासा जर पाण्यात गेला हे पकडणा-याला दिसले तर त्याच्या शिव्याही खाव्या लागत .पण त्याबरोबरच मज्जाही यायची व आनंदही वाटायचा. मासा पकडला आणि यशस्वीपणे पिशवीत गेला की लढाई जिंकल्याचा आनंद व्हायचा ,पण ही लढाई मात्र हातघाईवरची असायची. शेवटचे टोक जवळ आलेले असायचे ओहोटीचे पाणी पुर्ण खाली गेलेले असे.आता पायाच्या खुब्यापर्यंतच्या पाण्यात आणि छोटया छोटया खडड्यांत अडकलेले मासे जाळे बाजूला फेकून नुसत्या हातांनीच पकडायला सगळेजण सुरूवात करत.  सगळं व्यवस्थित जुळून आलेले असेल तर सगळीकडे मासेच मासे असत. फक्त उचलून पिशवीत टाकायची लगबग असायची.पिशव्या माशांनी भरून टरारून फुगलेल्या असायच्या.  नीट काही जुळले नसेल तर गुडघाभर पाण्यापासूनच अंदाज आलेला असायचा .सगळेच निराश होऊन मिळेल तो लहानमोठा मासा पकडून रात्रीच्या कालवणापुरते तरी मिळावेत अशी आशा करत असत. ब-याचवेळी निराशा पदरी घेऊनच परत फिरावे लागले तरीही पुन्हा मिळतील या आशेने ते पाण्याबाहेर पडत. तिथल्याच खड्डयात चिखलाने बरबटलेले अंग आणि आसू स्वच्छ धुवून घरचा रस्ता धरत.
            दीपवनीचे वैशिष्ट्य म्हणजे यात मिळणारे मासे हे फक्त बोय (बोईट) या प्रकारचेच असतात. वेगळयाप्रकारचे मासे क्वचितच असतात. या मासे पकडण्याच्या पद्धतीत खूप कष्ट करावे लागते. जवळजवळ दोन तीन किलोमीटर छातीभर पाण्यापासून ते टीचभर पाण्यात येईपर्यंत चिखलातून सलग मासेमारी करावी लागते त्यामुळे शारीरिक क्षमतेचाही कस लागतो. यशापेक्षा अपयशाचीच हमी जास्त असते .तरीही "लाख नाहीतर खाक " या न्यायाने उत्तम एकजूटपणे काम करण्याची कुवत आणि मिळेल त्यात आनंद मानण्याची वृत्ती यामुळे दीपवनीला जाणारे बहाद्दर पुढचा दीपवनीचा मुहूर्त साधायला आनंदाने तयार होतात. काही दिवसांनंतर पुन्हा तेच नियोजन अन् तीच कृती त्याच उत्साहाने करायला तयार होतात. शेवटी नियतीही त्यांच्यापुढे हात टेकते आणि मग भरभरून मासे घेऊन येतानाचा त्यांचा आनंद काय वर्णावा .....तो आनंद प्रत्यक्ष अनुभवण्याचाच असतो.
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो. 8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com

Monday, December 9, 2019


आठवणीतली उध्वस्त धर्मशाळा

उरण तालुक्यातील खोपटे गावाकडून खाडीवरील पूल ओलांडून गेल्यानंतर लगेच डाव्या हाताला एक नविन रस्ता सुरू झाला आहे. द्रोणागिरी नोड मार्गे उरण किंवा नविन होणा-या करंजा जेट्टीकडे जाण्यासाठी हा एक चांगला,वेगवान आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त असा हा रस्ता मोटारसायकल- कार किंवा इतर खाजगी वाहनाने जाणा-यांसाठी पसंतीचा ठरत आहे. याच रस्त्याने जाताना आज ज्यांचे वय अदमासे पस्तीस-चाळीशीपार असेल अशांचे लक्ष एक वास्तूच्या शोधात त्यांच्याही नकळत भिरभिरत राहते.खरंतर पहिल्या फेरीत ती वास्तू त्यांना ओळखूही येत नाही.मग पुन्हा कधीतरी तरी थोड्या अंदाजाने आणि सावकाशपणे पाहिल्यावर दिसते ती झाडावेलींनी जवळपास पूर्ण झाकलेली आणि वरचे छप्पर नावालाही शिल्लक नसलेली , फक्त दगडी भिंतीच शिल्लक राहिलेली ती तो शोधत असलेली वास्तू.  कित्येकजण मुद्दाम थांबून गाडी रस्त्यावर कडेला लावून रस्त्यापासून शंभर-दीडशे मीटर अंतरावर असलेल्या त्या पडक्या भिंती पहायला जातात. जाताना मनात पंचवीस-तीस वर्षापूर्वीच्या काही आठवणी मनात घोळवत त्याच्याशी साम्य असणारे काही दिसते का हे शोधू पाहतात..... कारण काय तर निव्वळ 'विनाकारण'.
   काय शोधत असतील तेथे???
  नेमके काय होते तेथे???
  कोणता ऐतिहासिक वारसा आहे का या वास्तूला ???...... तर नाही.
मग काही पौराणिक संदर्भ तरी ???....अजिबात नाही.
बरे काही पुरातत्विय वैशिष्ट्ये ???....तर तेही नाही.  मग कोणी खास थांबून पाहण्यासारखे काय आहे तेथे ...
कोणती आहे ती पडकी वास्तू ??? 
ती आहे एक मोडकी तोडकी वापराविना बिनउपयोगाची उध्वस्त 'धर्मशाळा'. आता जर ती एक पडकी वास्तूच असेल तर त्यात एवढे काय विशेष आहे की ती लेखाचा विषय व्हावी.....           रायगड जिल्ह्यातील उरण तालुका हा आकाराने लहान तालुका . पण लहान असला तरी हा तालुका नेहमीच दोन भागांत विभागला गेलेला आहे. पुर्वी तो राजकीय दृष्ट्या अर्धा अलिबाग मतदारसंघाशी आणि अर्धा पनवेल मतदारसंघाशी जोडला होता. सध्या तोच सिडको-नाॅन सिडको असा दोन भागात विभागलेला दिसतो. तालुक्यातील पूर्व भागातील गावे आणि उरण भागातील महालण विभागासह गावे यांना वेगळे केले आहे ते खोपटे गावाजवळून जाणाऱ्या खोपटा खाडीने. आज जरी हा भाग गोडाऊन्स आणि वेअर हाऊसेस मुळे प्रचंड रहदारीचा झाला असला तरी दोन दशकांपूर्वी हा भाग फक्त चिखलाचा आणि खारफुटीने भरलेला होता. ना रस्ते होते , ना दळणवळणाची साधने. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष तर एवढे की गावातील तलावाचेच पाणी प्यावे लागे. शेताच्या मोठमोठया बांधावरून जाणारी पायवाट हेच त्यावेळचे महामार्ग होते.त्यात वर मध्ये असलेली खाडी हा दळणवळणातील सर्वात मोठा अडथळा होता. तालुक्याच्या गावावरून येणारी एस्.टी. एकतर संपूर्ण तालुक्याला फेरी मारून चिरनेर पर्यंत यायची किंवा या खाडीच्या पश्चिमेकडील किना-यापर्यंतच यायची. खाडी पार करायची असेल तर छोटी होडी होती. याच होडीतून पैलतीरावर गेल्यावर जिथपर्यंत एस्.टी. येऊन थांबायची तिथे प्रवाशांना थांबण्यासाठी ही धर्मशाळा एका जैन माणसाने बांधून दिली होती. होडीतून उतरून येथपर्यंत पोहोचताना जर एस्.टी. निघून गेली तर पुढील बस दोन तासानंतर असल्याने .पुढची बस येईपर्यंत विसावा घेण्यासाठी आणि ऊन,वारा,पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी हक्काची जागा म्हणजे ही धर्मशाळा होती.
         काय काय नसेल पाहिले या वास्तूने....सणासुदीला हौसेने तालुक्याला जाऊन आपले बजेट सांभाळून केलेली वेगवेगळ्या वस्तू,कपडे यांची खरेदी जपून आणताना .तर कधी बजेटबाहेर खरेदी गेल्याने प्रवासात उतार देण्यासाठीही पैसे न उरल्याने आता होडीतून पलिकडे कसे जायचे या विवंचनेत असलेले बाबा आणि या सगळयाची काहीच कल्पना नसलेली पण आवडीची वस्तू मिळाल्याने खूष झालेली बालके या सर्वांच्या आनंद-दु:खाचा  साक्षीदार ही वास्तू आहे. गाव सोडून मुंबईला हाॅटेलात काम करून चारपैसे मिळवण्यासाठी निघालेल्या नुकताच लग्न झालेल्या तरूणाच्या आणि त्याला सोडायला म्हणून आलेल्या त्याच्या पत्नीच्या मनातील अबोल खळबळ या वास्तूने अनुभवलीच पण त्याचबरोबर होळी किंवा गणपतीच्या सणाला मुंबईहून येणा-या घरधन्याने सात आठ दिवस आधी कोणाकरवी तरी मी अमुक दिवशी येतो असा निरोप दिलेला असल्याने ते मधले दिवस कसेतरी ढकलून ठरल्या दिवशी ठरल्या वेळेपेक्षा दोन चार तास आधीच येथे पोहचून नव-याच्या वाटेला डोळे लावून बसलेल्या अन्  दर पाच मिनिटांनी डोळयांवर आडवा हात धरून दूरवर येणारी बस दिसते का...हे पाहणा-या पत्नीची अधीरताही जवळून पाहिली असणार. वाट पाहून थकल्यावरही बस आल्याबरोबर त्यातून सामानाच्या पिशव्या घेऊन खाली उतरणा-या आपल्या नव-याला बघून आनंदाने धावत जाणाऱ्या बायकोचा आनंदही पाहिला आणि कधी काही कारणाने ठरल्या वेळी येऊ न शकलेल्या नव-याची वाट बघून परत फिरलेल्या बायकोच्या डोळयातील कुणाला दिसू नये म्हणून लपवत असलेले अश्रूही पाहिले असणारच.
        प्रथमदर्शनी एक दगडी भिंतींची इमारत एवढीच जरी ओळख आपल्याला वाटत असली तरी ही धर्मशाळा हे संपूर्ण तालुक्याच्या दळणवळणाच्या सोई-गैरसोई, त्यात होत जाणारी स्थित्यंतरे या सर्वाचा एक मूक साक्षीदार आहे. आपल्या जिल्ह्यात ब-याच ठिकाणी अशा काही वास्तू निश्चितच असणार. ही पडलेली धर्मशाळा त्या सर्व वास्तूंचे प्रतिनिधित्व करते.  आज जर हा सगळा भाग बघितला तर याच भागातून कधीकाळी गुडघाभर चिखल तुडवत आज जीला आपण टिन का डिब्बा म्हणून हिणवतो किंवा गरीबांची लालपरी म्हणून अनादर करतो त्या एस.टी बसने प्रवास करणेही विमानात बसल्याचा आनंद मिळवून देत होती हे आताच्या नव्या पिढीला पटणार नाही. सध्या अर्ध्यामुर्ध्या भिंती पाहून आजची पिढी कदाचित तिच्याकडे पाहून नाक मुरडेल,पण आपली जबाबदारी आहे ती या वास्तूची खरी ओळख त्यांना करून देण्याची.  हा विषय फक्त एका गावातील एखाद्या इमारतीचा नाही तर गावोगावी असलेल्या अशाप्रकारच्या अनेक ठिकाणांचे काळाच्या ओघात म्हणा किंवा विकासाच्या वाटेवर चालताना उपयोगशून्य होऊन आज विस्मरणात गेलेल्या , पण आपल्या गतकालात वैभवशाली सुवर्णकाळ पाहिलेल्या यांसारख्या कित्येक वस्तू, वास्तू वा ठिकाणांची किमान माहितीतरी आज उपलब्ध व्हावी व अशा  दुर्लक्षित होऊन विमनस्कपणे कसाबसा तग धरून उभ्या असलेल्या वास्तूंचा परिचय व्हावा हीच अपेक्षा. या धर्मशाळेच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील अशाच काही स्थळांच्या आठवणी जागवल्या गेल्या तर त्यासारखे आनंददायी दुसरे काही असेल असे वाटत नाही....हे सर्व लवकरात लवकर होऊ दे. नाहीतर उरणच्या या परिसरात होणारी विकासकामे,  तयार होणारे रस्त्यांचे जाळे पाहता या उरल्या सुरल्या भिंतीही फारतर चार पाच वर्षेच टिकतील.नंतर कुणालाही समजायच्या आत त्यावरून बुलडोझर फिरवून भुईसपाट केली जाईल. मग मात्र दाखवून सांगण्यासारखे काहीच उरणार नाही.कुणाच्याच हातात नसेल ते,  अगदी काळाच्याही......

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
ई मेल pravin.g.mhatre@gmail.com
       

Wednesday, December 4, 2019


कळीदार कपुरी पान........





"कळीदार कपुरी पान , 
कोवळं छान केशरी चुना
रंगला कात केवडा, 
वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा....."
सुलोचना चव्हाण यांनी गायलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले हे अजरामर गीत असो किंवा
"पान खाएँ सैया हमारो, साँवली सुरतीया होंट लाल लाल... " हे आशाताईंच्या आवाजातील शंकर जयकिशन यांचे गाणे आसो...पान म्हटले की सगळयांनाच 'होंट लाल लाल... ' ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.त्यात अजून 'खईके पान बनारसवाला... म्हटल्यावर तर 'बंद अकलका ताला ' खुलायला पण वेळ लागत नाही. असे हे पान आपल्या सर्वांना 'विडयाचे पान ' या नावाने परिचित आहे. भरपेट झालेले जेवण आणि त्यावर केलेले तांबुलप्राशन' आपल्या आयुर्वेदातही मानाचे स्थान पटकावून बसलेले आहे. पण हे खायचे पान फक्त खाण्यासाठीच वापरले जाते असे नाही.आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात यानेच आदयपूजन केले जाते .ते आणि या पानावर ठेवलेली सुपारी हेच त्या गजाननाचे रुप मानले जाते आणि त्याचेच पूजन करुनच शुभकार्याला सुरुवात केली जाते.
नागवेल पानाच्या उत्पत्तीची एक कथा सांगितली जाते ती अशी......
देव दानव मिळून समुद्रमंथन केले. एक एक करत रत्ने निघत गेली आणि एकदाचे ज्यासाठी हा सर्व खटाटोप केला होता त्या अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी अवतरला. अमृत प्रथम आपल्यालाच मिळावे यासाठी देव आणि दानव दोघेही आतुर झाले .शेवटी श्रीविष्णूने मोहिनीरुप घेऊन देवांना अमृताचे वाटप केले व राहिलेले काही थेंब नागराज नावाच्या हत्तीच्या म्हणजेच गजराजाच्या साखळदंड बांधलेल्या खांबाजवळ झटकले त्यातनच एक वेल उगवून ती नागाप्रमाणे वळसे घेत सरसर त्याखांबावर वर चढत गेली.तिच्या त्या सर्पाकार चढण्यामुळे आणि नागफणीसारख्या पानांमुळे तिला नागवेल म्हणू लागले .अमृतबिंदूंपासून उत्त्पत्त्ती झाल्यामुळेच त्या पानांचा विडा भोजनानंतर खायला देवांनी सुरुवात केली आणि अर्थातच मग त्याला सर्वमान्यता मिळाली .यथाकाल हे खायचे पान म्हणून परिचित झाले.
नागवेल पायपरेसी कुलातले आहे अन् त्यामुळेच पायपर बीटल हे शास्त्रीय नाव दिल गेले आहे. नागवेलीचे मूळ स्थान जावा बेटे असून कपूरी, मलबारी, अशा जाती प्रसिद्ध आहेत.वेलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचे कांडे आलटून पालटून कलंडतच चढत जाते आणि आपल्या नावातील नाग या शब्दाला न्याय देते.नागवेलीचा त्रयोदशगुणी विडयाला तर धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही ठिकाणी सर्वगुणसंपन्न मानले जाते आणि ते खरेही आहे ,कारण यात कात, चुना, सुपारी, विलायची, लवंग, बडीसोप, खोबरे, जायपत्री, जेष्ठमध, कापूर, कंकोळ, केशर आणि खसखस असे तेरा आरोग्यदायक घटक असतात. यातील प्रत्येकाची गुणकारी अशी ओळख आहे .मग हे तेरा एकाच विडयात असतील तर मग काय बोलायलाच नको. यासह गोविंदविडा, पानपट्टी , पुडीचा विडा, पुनेरी, मद्रासी, तिखट, कलकत्ता , बनारसी असे कितीतरी प्रकार व रुपाने हे पान आपल्याला भेटतच राहते. कोणी पान खात असेल किंवा नाही पण प्रत्येकाने कधी ना कधी आयुष्यात एकदा तरी मसाला पान हे खाल्ले असेलच. अगदी लहानपणी किंमत परवडत नसल्यानेदोन तीन मित्रांनी एक मसाला पान विकत घेऊन ते वाटून खाल्लेले असणारच नाही का...
पान खातानाही काही संकेत पाळले जातात.पानाचा विडा तयर करताना प्रथम त्याचा देठ आणि शेवटचे टोक तोडून टाकतात. देठ आणि टोक खाऊ नये असे मानले जाते. यामागे पानाच्या आत वास्तव्य करत असलेल्या देवदेवता आहेत, कारण पानवेलीच्या पानाची उजवी बाजू ब्रम्हदेवाची , डावी बाजू पार्वतीची, मध्ये सरस्वती , लहान देठात श्रीविष्णू ,मोठया देठात अहंकाराची देवता व टोकात दारिद्रयलक्ष्मी, तर पानाखाली मृत्यूदेव आहे असे मानतात आणि त्यामुळेच देठ व टोकाची गच्छंती होते.
नागवेल पानाचे औषधी गुणधर्म ब-यांच जणांना माहीत असतील .वात व कफाच्या विकारावर तसेच मुखशुद्धीसाठी पान खाल्ले तर आराम पडतो. डोके जड होणे, दुखणे, शिंका येणे- नाक गळणे यावरही रामबाण उपाय आहे.
मात्र याच दैवी पानासोबत काही लोक तंबाखू , मावा असे विघातक पदार्थ खातात आणि कुठेही लाल पिचकाऱ्या मारुन भिंती, जिन्याचे कोपरे, सार्वजनिक वाहनांतील खिडक्या घाण करतात तेव्हा मात्र राग तर येतोच पण किळसही वाटते. यामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणवणारेही असतात हे दुर्दैव !! अशावेळी लहानपणी प्रत्येक लग्नघराच्या चुना व निळीच्या रंगाने रंगवलेल्या भिंतीवर अगदी बाळबोध लिपीत, वाकडया तिकडया अक्षरात लिहलेला.... " या बसा पान खा, पण भिंतीवर थुंकू नका..." हा वरवर प्रेमळ वाटणारा पण सूचनावजा सल्ला आजही ठिक ठिकाणी असावा असे जरूर वाटून जाते.....भोजनानंतर खाल्लेला पानाचा विडा हा अन्नयज्ञातील सांगतेची आहुती समजून त्याचे पावित्र्य राखून खावा हीच अपेक्षा...
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण
मो.8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com

Tuesday, December 3, 2019


दगडाच्या वस्तू..
सुंदर माझे जाते गं
फिरते बहुत ।
ओव्या गाऊ कौतुके
तू ये रं बा विठ्ठला ।।
जीव शिव दोन्ही सुंडे गं
प्रपंचाच्या नेटे गं ।
ओव्या गाऊ कौतुके
तू ये रं बा विठ्ठला.........
        काही वर्षे मागे गेलो तर खेडयातली पहाट अशा जात्यावरच्या ओव्यांनी आणि सोबत जात्याच्या एकलयीतील घरघरीने उगवत असलेली आपण अनुभवलेली असेलच. नसेल अनुभवली तर आपण एका स्वर्गीय सुखाला पारखे झालो असे समजायला काहीच हरकत नाही. काय छान, सुखद अनुभव असायचा तो. पहाटे पहाटे कोंबडा आरवला की , घरातल्या कर्त्या स्त्रिया उठून झाडलोट करून जात्यावर बसत. जमिनीवर अंथरलेल्या एका धडशा फडक्यावर दगडी जाते ठेवून जात्याच्या वरच्या पाळीवर असलेल्या छोटया छिद्रात लाकडी खुंटा ठोकून बसवत.  शेजारी सुपात दळणासाठीचे, आदल्यादिवशी पाण्याने धुवून कडक उन्हात वाळवून ठेवलेले तांदूळ भरुन ठेवलेले असायचे. मग दोघीजणी जात्याच्या दोन बाजूला समोरासमोर बसत. दोघींनीही आपला डावा पाय घडी करून जवळ घेतलेला असायचा तर दुसरा पाय जात्याच्या समांतर बाजूला लांब पसरलेला असायचा . शेजारी असलेल्या अंथरूणावर लहान मुले अर्धवट झोपेत लोळत पडलेली असत ,त्यांचा डोक्यावरून मायेने सावकाश हात फिरवत फिरवत नंतर एक हात खुंटयाला व दुसर्‍या हाताने सुपातील दाणे जात्यात टाकत. जात्याच्या मुखात दाण्यांची मूठ पडताच. त्यांच्या मुखातूनही सुरेल ओव्या आपोआपच बाहेर पडत. दोघींही खुंटयाला धरलेला हात अगदी सहज ताळमेळ राखत जात्याला गोलाकार फिरवत. 'जात्यावर बसले की ओवी आपोआप सुचते' अशी एक म्हण आहे आणि ती खरीही आहे.सूर्योदयापर्यंत एक दोन पायल्यांचे दळण सहज दळून काढत. ब-याच वेळी तर एकटीच जाते ओढून दळण करत असे. जसजशा ओव्या बाहेर पडत तसतसे पीठही जात्यातून बाहेर पडू लागायचे. हे जाते म्हणजेच जुन्या काळातील हा एक ग्राईंडरच होता. जात्याचेही दोन तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार हे तांदूळ दळणासाठी वापरले जाते जे साधारणत: दीड फूट व्यासाची एकावर एक ठेवलेली दोन गोल पाळं असलेले ते "पीठजाते" . तर दुसरे दगडाचेच पण जवळपास अडीच ते तीन फूट व्यासाचे जाते असायचे जे भात दळून तांदूळ काढण्यासाठी उपयुक्त पडत असे.त्याची ओळख "भात जाते " अशी आहे .....आणि हो , जात्याचा एक अनोखा उपयोगही क्वचित प्रसंगी खेडेगावात करत. जर कोणी पाण्यात बुडाला आणि त्याला पाण्याबाहेर काढले की त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्यासाठी त्या व्यक्तीला जात्यावर बसवून गरगर फिरवत.  एकदा का त्याचे पोट ढवळून निघाले की उलटीवाटे सर्व पाणी पोटाबाहेर पडे. अशाप्रकारे माणसाचा जीव वाचवण्यासाठीही हे जाते उपयोगी पडे........प्राचीन काळापासून माणूस जाते वापरत आला आहे. अगदी मोहेंजोदडो उत्खननात लोथल येथे दगडी जाती सापडली आहेत.हे जाते म्हणजे अश्मयुगीन माणसाची भटकंती संपून शेती करणा-या स्थिर मानवी समाजाची निर्मिती झाल्याचे निदर्शक असल्याचे सक्षज लक्षात येते.           जाते हा जसा जुन्या काळातील ग्राईंडर होता, तसाच त्याकाळी घरोघरी एक दगडी 'मिक्सर' असायचा.आठवला का हा मिक्सर कसा असायचा तो ???.... हो ! बरोब्बर ... तोच आपला " पाटा-वरवंटा" . छान पंचकोनी आकाराचा दगडाचा पाटा आणि दंडगोलाकार मधला भाग फुगीर असलेला वरवंटा प्रत्येक घरात हमखास आढळून येत असे. मिरची - खोब-याचं वाटण वाटायचे असो ,की खरपूस भाजलेल्या सुकटीची सुक्या किंवा ओल्या मिरच्या घालून वाटलेली झणझणीत चटणी असो, पाटा-वरवंटा हा लागायचाच. जंगलातून आणलेली हिरवी करवंदे ठेचून त्यांची छान 'कंदोरी' बनवायची असेल तर पाटा-वरवंटा हवाच असायचा. पण हा पाटा फक्त वाटण वाटणे किंवा चटणी वाटण्यापुरताच मर्यादित नाही , तर नवीन जन्मलेल्या बालकाची पाचवी करताना सटवाईची पूजा करण्यासाठी हाच दगडी पाटा अजूनही वापरतात.तीच गोष्ट तेच लहान मूल मोठे होऊन त्याचे लग्न करायचे ठरले की,लग्नात  देव उठवण्यासाठी आवश्यक असतो तो पाटा वरवंटाच. एवढेच नव्हे तर घरातील आजी आजोबा आपल्या उरल्यासुरल्या दातांनी जेव्हा चणे-फुटाणे खाता येत नसतील तर ते यावरच छानपैकी वाटून खात.
     जाते असो किंवा पाटा-वरवंटा असो. पीठ नीट दळून बारीक होण्यासाठी , वाटण बारीक वाटून होण्यासाठी त्यावर तिरक्या,आडव्या तिडव्या बारीक खाचा पाडलेल्या असायच्या. या अशा खाचा पाडण्याला 'टाकी लावणे' म्हणतात.दर दोन तीन वर्षांनी जात्याला आणि पाटयाला लावावी लागत असे (ते प्रल्हाद शिंदेंचं 'तुझ्या जात्याला लाव गं टाकी... हे गाणं आठवतं का.).. त्या टाकी लावणा-यांची म्हणजे पाथरवटांची "जात्याला,पाटयाला टाक्की लावून घे गं बाई.... किंवा 'ऐ टाक्कीय्य.."अशी हाक गेल्या काही वर्षांत ऐकायलाच मिळत नाही. घरोघरी आलेल्या इलेक्ट्रिक मिक्सर,ग्राईंडरने त्यांचा व्यवसाय कधीचाच मोडकळीस आला आहे.
          आणखी एक दगडी वस्तू पूर्वी घराघरात असायची. ते म्हणजे घराचे नाभी स्थान मानले जाणारे 'दगडी ऊखळ.'  याबात जुने लोक किती आग्रही असत त्याचे उदाहरण दयायचेच झाले तर........
    एकदा एक माणूस घरात पाहुणा आला. त्याला पाणी हवे होते पण दिलेले पाणी त्याने प्यायला नकार दिला .कारण म्हणे तुमचे घर अपूर्ण आहे.घराला नाभीच नाही,म्हणजे घरात उखळ नाही आणि अशा घरचे पाणी मी पिऊ शकत नाही.नंतर त्याला घरातील उखळ दाखवल्यानंतर त्याने पाणी घेतले. आता शहरात तर अजिबात उखळ नसते. बिल्डरांनी जागेची कमतरता आणि ग्राहकांची अगतिकता याचा अचूक फायदा घेत अशा भारतीय अन् त्यांच्या मते बिनउपयोगी वास्तूशास्त्रानुसार घर मिळणेच शक्य नाही अशी मखलाशी करून आपले स्वत:चे उखळ मात्र पांढरे करून घेतले.तर गावात खूप जुनी घरे वगळता ते कुठेही पहायला मिळणार नाही. नवीन पिढीला हे सगळं थोतांड आहे पटवून देण्यात तथाकथित 'फुरोगामी'(?) यशस्वी झालेत.त्याऐवजी चायनीज फेंगशुईच्या वस्तू त्यांच्या गळ्यात मारुन आपल्या तुंबडया भरून घेतात. इकडे आपण घरचे सोडून परक्याला आपले मानून आम्ही 'अॅडव्हान्स' झाल्याचा तोरा मिरवत बसलो आहोत आणि आम्हीच दगड आहोत हे जगाला दाखवून देत आहोत.
        दगडी वस्तूंबद्दल बोलायचे आणि खलबत्त्याची आठवण काढायची नाही हे कदापि शक्य नाही. स्वयंपाकघरातील एखादया कोप-यात का होईना पण आपले स्थान पक्के करून ठेवलेला खलबत्ता गृहिणींसाठी बहुपयोगीच. आले लसणाची पेस्ट बनवण्या पासून खोबरे कुटण्यापर्यंत खलबत्ता कामी यायचा. कधीकधी हाताशी हातोडी नसेल किंवा नेमक्या वेळी ती सापडत नसेल तर खलबत्त्यातील बत्ता हातोडी म्हणून वापरता येत असायचा.(कित्येकांना खल आणि बत्ता हे दोन शब्द आहेत हेच माहित नाही, ज्यांना माहित आहे त्यांना खल कुठला आणि बत्ता कुठला हेच ओळखत नाही..अगदी 'नटबोल्ट' सारखे) अर्थात याच्या दगडी रूपाबरोबरच लोखंडी,  पितळी असे वेगवेगळे अवतार साथीला असतातच. अगदी आयुर्वेदातील काही चाटणे,भस्मे घोटण्यासाठी तर संगमरवरी खलबत्तेही वापरतात.
       काळ बदलला , माणसे बदलली , घरे बदलली,  तशा घरातील वस्तूही बदलल्या . अगदी आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलांसाठी खस्ता खात त्यांना मोठे केल्यानंतर जसे त्या मुलांच्या घरात म्हातारे आईवडिल अडगळीत पडतात, अगदी तशाच यावस्तूही आता एकतर अडगळीत पडलेल्या दिसतात नाहीतर घराबाहेर फेकलेल्या दिसतात. काळाची चक्रे उलटी फिरवता येत नाहीत हे निर्विवाद सत्य असले तरी कधीकाळी माणसाचे जीवन सुकर करणा-या या वस्तूंचा किमान परिचय तरी आपल्या भावी पिढीला करून दयायला काय हरकत आहे. 
             "राकट देशा, कणखर देशा ,
               दगडांच्या देशा.."
अशी ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्रात तरी हे व्हायलाच हवे नाही का ????

प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com
      
   
   

Thursday, November 21, 2019


मेंढरांमागची भटकंती....


नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस काही परत फिरायचे नाव काढायला तयार नाही.धडधड एकामागोमाग एक अशी तीन तीन वादळे येणे आणि ती सुद्धा पाऊस आपले चंबू गबाळे आवरून भैरवीचे सूर आळवावे तसे ढगांचे नगारे आणि विजांच्या नाडमोडी, सळसळणा-या तारा छेडत निरोप घेत असताना ...हे अति म्हणण्याच्याही पलिकडचे आहे. या अचानक कधीही उद्भवणाऱ्या कमी दाबांच्या पट्टयांनी तर एवढी धडकी भरवून ठेवली आहे की, अर्धाअधिक महिना संपला तरी पाऊस गेला असे छातीठोकपणे सांगायची कोणाचीही छाती होणार नाही.अगदी हवामान खात्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवले तरीही...नाही म्हणायला त्यांचे काही काही अंदाज ठरतात हो खरे ! रोजरोज खरी भविष्ये सांगायला ते काही बांधिल नाहीत कुणाचे.त्यांनी नेहमी 'अंदाज'च वर्तवलेले असतात आणि ते 'अंदाज' ते इमानेइतबारे 'अंदाजे' च सांगतात. परंतु या सगळ्या बेभरवशाच्या परिस्थितीमुळे काही नियमितपणे घडणाऱ्या घटनांचे चक्रसुद्धा बिघडले आहे. वर्षभर राबराब राबून पिकवलेल्या पिकाचे आणि शेतक-याच्या काळजाचेही शब्दशः पाणी-पाणी झालेच आहे. हे सगळेजण जाणतातच पण त्याचबरोबर दाणागोटयाने भरलेल्या घरातला समाधानी झालेल्या शेतकऱ्यांकडून आपलीही वर्षातील काही महिन्यांची तरी का होईना पण बेगमी करून घेण्यासाठी याच कालावधीत कोकणात उतरणारे विविध प्रकारचे मेंढपाळ, नंदीवाले,  पोतराज म्हणजेच भवानी किंवा मरूआई घेऊन येणारे असे लोकही साशंकताच बाळगून आपली कोकणची वाट सावकाशपणे धरत आहेत असे जाणवते.
        याच काळात सर्वात आधी येतात ते मेंढरांवाले... हो त्यांची ओळख इकडे 'मेंढरांवाले' अशीच आहे. साधारणतः सोलापूर, सांगली या जिल्ह्यातील हे मेंढपाळ नोव्हेंबरच्या सुरूवातीला आपल्या कुटुंबकबिल्यासह भटकंती करत,  शेतांशेतांमध्ये आपली मेंढरं घेऊन जवळजवळ चार-पाच महिने फिरत असतात. वाटेत दिवस ढळू लागला की त्या कबिल्याचा म्होरक्या जवळपास असलेल्या गावात जातो . ब-याचवेळेस हा म्होरक्या आपली 'तहान' भागविण्यासाठी (पाण्याने नव्हे बरं का..) धंदयाच्या शोधात निघालेलला असतो.  तसा तो याआधीही अनेक वर्षे या भागात येत असल्याने तो नेमके घर शोधून काढतोच आणि नसेलच माहित तर ते शोधून काढण्याचे कौशल्य कसे कोण जाणे हयांना साध्य झालेले असते कोणास ठाऊक पण शोधून काढतातच.कदाचित तळीरामाचा आत्मा त्यांना मदत करत असावा असे वाटते.यामध्येही एक दुसरे छुपे कामही त्याला करायचे असते . ते काम म्हणजे गावातील कुणी शेतकरी 'मेंढरं बसवायला' तयार आहे का याबद्दल आदमास घ्यायचा असतो. हे मेंढरं बसवणे म्हणजे रात्री एखाद्या शेतात मुक्काम करून सगळी मेंढरं त्या शेतात बसवून ठेवायची. यामुळे रात्रीच्या मुक्कामासाठी जागाही मिळायची आणि वर ज्याच्या शेतात रात्रीचा मुक्काम करतील त्या शेताचा मालक त्यांना चार-पाच पायल्या तांदूळ किंवा काही ठराविक पैसे ,कधीकधी दोन्ही देत असतो. असा दुहेरी फायदा या मेंढपाळांना मिळतो. त्याचप्रमाणे मेंढरांचे मलमूत्र उत्तम प्रकारचे नैसर्गिक खत असल्याने शेतक-यासाठीही हा सौदा फायदयाचाच ठरतो आणि त्यावर्षी त्याला कमी खत वापरून चांगले पीक येते. त्याबदल्यात दोनचार पायल्या तांदूळ देणे कधीही परवडणारे ठरते. या पैशांवर आणि तांदूळांवर मेंढपाळांचाही उदरनिर्वाह चालतो. त्यामुळेच की काय पण हे लोक रात्रीचा मुक्काम कोणी सांगितले नाही तर सहजासहजी कुणाच्या शेतात करत नाहीत.  नाहीच कोण तयार झाले तर एखाद्या कातळ किंवा माळरानावर मुक्काम करून आपला 'बिझनेस माईंड' जपतात. अगदीच अशक्य असेल आणि शेतातच मुक्काम करण्यास पर्याय नसेल तर रात्री मुक्काम करून दुस-या दिवशी तो म्होरक्या शेताच्या मालकाला शोधून काढतो आणि त्याच्याकडून काहीतरी वसूल करतोच.तशी त्याला जास्त शोधाशोध करावी लागतच नाही कारण, शेताच्या मालकापर्यंत ही खबर गावखेडयातील अनधिकृत सूत्रांकडून पोहोचलेली असायचीच त्यामुळे तो सकाळीच शेताच्या बांधावर  हजर होतो आणि आयताच सापडतो. थोडी खळखळ करतो पण देतो काहीतरी. तरीही हा मिळणारा मोबदला मेंढपाळांच्या संपूर्ण कुटुंबाला पुरेसा नसतोच.त्यातच हाच शिधा आणि पैसा पुढील वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असतो.तो संपवून टाकला तर नंतर काय खाणार हा प्रश्न असायचाच. त्यामुळे मग संध्याकाळी काही वयस्कर महिला गावात फिरून भाकरतुकडा मागत फिरत,  तर काही मुले गावात आपल्या बोलीतील गाणी म्हणत .कोणी एक-दोन रुपये देत त्याचा खाऊ खाऊन आनंद साजरा करत.खारेपाट भागात फिरताना गावापासून दूर असतील तर लहान मुले शेतातील पाण्याच्या खड्डयांमध्ये लहानलहान मासे पकडत. नंतर तेथेच गवत जमवून त्याची शेकोटी पेटवून त्यात ते मासे भाजून खात.त्यात कधीकधी एखादा आपल्या गलोलीने एखादे पाखरू मारून तेही भाजून खात,  तीच त्यांची तंदुरी.एवढयानेही नाही भागले तर मग कधीकधी पोटाची आग शमवण्यासाठी नाईलाजाने पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या मेंढराला-कोकराला विकून त्यातून दिवस भागवावा लागतो.
       या भटक्या जीवनामुळे खरे हाल होतात ते लहान मुलांचे. थंडी,ऊन,वारा या सगळ्यात ती करपून जातात. अर्धे वर्षे भटकंतीतच जात असल्यामुळे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजांचीच जिथे पूर्तता होऊ शकत नाही तिथे शिक्षणाची काय बात.... शिक्षणासाठीच्या शाळेच्या हजेरीपटावर नाव पण  शाळेच्या वाटेपासून मैलोन् मैल दूर ही मुले आयुष्याच्या शाळेत जगण्याचे खडतर धडे गिरवत असतात. इथे शासनाच्या शेकडो योजनाही थिटया पडतात.कोणाला दोष देणार ??? ... शासनाला,  पोटासाठी वणवण फिरणा-या त्याच्या पालकांना,  त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आणि हजेरीपटावर आज काय शेरा मारू या विवंचनेत अडकलेल्या त्यांच्या शाळेच्या शिक्षकांना की स्वत:ची काहीच चूक नसताना परिस्थितीच्या चरकात पिळवटून निघणा-या त्या बालकांना. परिस्थिती योग्य नाही म्हणून शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून परिस्थिती बदलत नाही .अशा विचित्र खोडयात अडकलेल्या मुक्या जनावरांसारखेच जिणे त्यांच्या नशीबी येते.
           या गावाहून त्या गावी  , त्या गावाहून  पुढच्या गावी असे करत करत  चार सहा महिन्यांनी घरी पोहोचायचे. जमवलेल्या बेगमीवर उन्हाळा,पावसाळा पार पाडायचा. त्यातच जत्रा,पालख्या, नवस सायास पार पाडायचे. मुलींची लग्ने कितीतरी लहान वयातच उरकून टाकली जातात . इथे कायदाही हतबल होतो. पुन्हा एका दुष्टचक्राला सुरुवात होते.लवकर लग्न,  लवकर मुले, लवकर जबाबदारी आणि ती पार पाडण्यासाठी पुन्हा नशिबी भटकंतीच.डार्विंनचा उत्क्रांतीवाद काहीसा या समाजाने जणू गोठवून ठेवला आहे. शेती करून स्थित झालेला यांचा मूळ पुरूष जन्मालाच आला नसावा असे वाटते. मान्य आहे काहीजण शिकले नोकरीही करू लागले.त्यांचे जीवनमान उंचावले. पण अगदी बोटावर मोजण्याइतकेच असतील.  शेवटी घटनात्मक आधार नसल्याने हा समाज आरक्षणाच्या आशेत आहे.पण त्यांच्या या आशेच्या आगीत त्यांचे तथाकथित उद्धारक आपल्याच पोळया भाजून घेत आहेत....बघूया किती दिवस ही भटकंती त्यांच्या नशिबी राहते ती. आशेचा किरण लवकर दिसू दे हीच अपेक्षा आणि प्रार्थनासुद्धा !!!
प्रविण गिरीधर म्हात्रे
पिरकोन,  उरण,  रायगड
मो. नं.  8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Sunday, November 17, 2019


   मातीची तुटलेली नाळ...
          
               घटाघटाचे रुप आगळे,
                प्रत्येकाचे दैव वेगळे
                तुझ्याविना ते कोणा न कळे
                मुखी कुणाच्या पडते लोणी
                कुणा मुखी अंगार....
                विठ्ठला तू वेडा कुंभार....
या गाण्यात वर्णिलेले त्रिवार सत्य कोणीही नाकारू शकणार नाही.एकाच मातीने , एकाच कुंभाराने, एकाच वेळी तयार केलेले असूनही कोणत्या मडक्याच्या नशीबी काय येईल हे सांगणे अशक्यच.ज्याच्या मुखी अंगार पडेल त्याचे आयुष्य काही पावलांचेच आणि लोणी पडेल ते मात्र वर्षानुवर्षे घरात हक्काने स्थान मिळवणार . तसे पाहिले तर अगदी वर्षानुवर्षे प्रत्येक घरात या मडक्यांनी अढळपद मिळवलेलेच आहे.काळ बदलत चालला तसे ते स्थान थोडे डळमळीत झाल्या सारखे वाटते. पण जर आपण काही वर्षे मागे जाऊन पाहिले तर मडकी आणि त्याचेच काही भाऊबंद माठ,  रांजण,  घागर,  सुगड,  घरोघरी असायचेच पण त्यासोबत खापरी ,जोगली, तई(तवी) , भगोले अशी नानाविध मृत्तिकापात्रे असायची.प्रत्येकाचे रूपरंग, आकार,उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे असायचे.
      
   लहानपणापासून आमच्या घरात माळयावर ठेवलेले जवळजवळ चार फूट उंच आणि अडीच ते तीन फूट घेर असलेले दोन मोठे आणि अडीचेक फूट उंचीचे दिड फूटापर्यत घेर असलेले एकदोन रांजण पाहत आलो आहे. वास्तविक पाहता रांजण  हे ब-याचवेळी पाणपोईच्या ठिकाणी पाण्याने भरून ठेवलेला कित्येकांनी पाहिलेले असतील, पण आमच्या घरी मात्र हे रांजण तांदळाच्या कोठया म्हणून तांदूळ साठवून ठेवण्यासाठी वापरले जात असत.  वर्षानुवर्षे हे रांजण घरात याच कामाकरिता वापरत असल्याचे मला आठवते. काही वर्षांपूर्वी (म्हणजेच सुमारे पंचवीस-तीस वर्षापूर्वी बरंका!)  तांदूळ साठविण्यासाठी पत्र्याची टाकी आणली. पण तरीही या रांजणांचा वापर सुरूच होता. सांगण्यासारखे वैशिष्ट्य हे आहे की, टाकी पेक्षा या रांजणामध्ये तांदूळ चांगल्याप्रकारे सुरक्षित राहत असत. कारण पत्र्याच्या लगतचे तांदूळ खराब होऊन त्यांना हमखास काळपट व भूरभुरीत होऊन ज्याला करपट (गावच्या भाषेत 'भासटान') वास येत असे. तसेच या रांजणांची विशेष अशी देखभालही करावी लागत नसे. फक्त जेव्हा कधी भातगिरणीतून भात दळून तांदूळ आणले जात तेव्हा हे मोठे रांजण सावकाशपणे माळयावरून उतरवून कडक उन्हात ठेवून झाडूने आतून बाहेरून साफ करून आत चिकटलेली किडे-पाखरे काढून टाकत. नंतर चूना पाण्यात कालवून त्याने आतल्या बाजूला रंगवले जात असे. जेणेकरून उरलेसुरले किडे मरून जावे व पुन्हा दुसरे होऊ नयेत. मग संध्याकाळी परत माळयावर नेहमीच्या जागी नेऊन ठेवले जायचे आणि नंतर त्यात तांदूळ भरून वर कडूलिंबाचा पाला टाकून रांजणाचे तोंड फडक्याने बांधून टाकत असत. आजही तो रांजण माळयावर आहे फक्त त्याचा वापर करायला कोणीही नाही.
        अशीच घरात हक्काचे स्थान असलेली मातीची वस्तू म्हणजे 'खापरी'अर्थात मातीचा 'तवा' . चूलीवर भाजलेल्या मातीच्या खापरीतल्या भाकरीची चव काय सांगावी ...आज ती चव मिळवण्यासाठी लोक शेकडयाने पैसे खर्च करतात, पण पूर्वी हीच भाकरी गावातील गरीबातल्या गरीब घरीही स्वत: बनवली जायची. 'घरोघरी मातीच्या चुली' ही म्हण आज लागू पडत नाही ,कारण आता मातीच्या चुलीच राहिल्या नाहीत .घरोघरी त्यांची जागा गॅसच्या  स्टीलच्या चुलींनी घेतली आहे. आता ती म्हण फक्त आपल्या जुन्या संस्कृतीची आठवण एवढयासाठीच आहे.  चूल गेली सोबत मातीची खापरीही गेली.चूल काही ठिकाणी अजून टिकून असली तरी तिची जागा घरात मुख्य स्वयंपाक घरातून घरामागच्या पडवीत स्थलांतरीत झालेली आहे . धूराने भिंती काळया पडतात ना...मग काय करणार..? . खापरीने आपले अस्तित्व थोडेफार टिकवून ठेवले असले तरी तिच्या बहिणी मात्र आज सगळयाच घरांमधून नाहिशा झाल्या आहेत  . त्या आहेत ' तवी' , 'जोगली' आणि 'भगोले'. जोगली हे त्यावेळचे पातेले आणि भगोले म्हणजे जेवणाचे ताट . यांचा आज कुठेही नामोनिशाण शिल्लक राहिलेले नाही .असलेच तर कुठल्या तरी जुन्या घरात अडगळीत टाकलेल्या व फुटक्यातुटक्या अवस्थेत असलेल्या आढळतील. छोटी छोटी सुगडे, मडकी घर बांधतानाच घराच्या भिंतींमध्ये तिरकी पूरून ठेवत असत. अनेक छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्याचे हे कप्पे असत. विशेषतः चुलीला लागून असलेल्या भिंतीत तर अशी दोन तीन मडकी असत. त्यातच खडेमीठ, सुक्या मिरच्या असे पदार्थ ठेवलेले असत. घरमालकीणीला आवश्यक वस्तू चटकन हातासरशी असाव्यात अशी ही सोय असे. लहान मुलांची खेळणीही मातीचे जाते, मातीची चूल अशीच असत.शाळेतून जर मातीची वस्तू बनवून आणायला सांगितली तर नव्व्याण्णव टक्के मुले मातीची चूलच बनवून नेत असत. हळूहळू तांबे, पितळ करत करत अॅल्युमिनियम ज्याला गावकरी 'जर्मन' म्हणतात अशा धातूची भांडी आली. त्यानंतर आलेल्या स्टेनलेस स्टीलच्या भांडयांनी तर सर्वच बदलून टाकले ना फुटत,  ना गंजत.  कल्हईची गरज नाही की तांब्याच्या भांडयांप्रमाणे घासून स्वच्छ करण्याची मेहनत अशा स्टीलच्या वस्तू धावपळीच्या जीवनात अत्यंत चपखल बसल्या आणि मातीच्या बहुतांश वस्तूंना मूठमाती मिळाली.
           खरंतर हया मातीच्या वस्तू बनवणारे कुंभार अतिशय मेहनत करून एक एक वस्तू तयार करत असतो. साधी वाटणारी खापरी तयार करायची तर माती आणण्यापासून ती चाळून व भिजवून मळून त्याची हवी तशी खापरी बनवून ती भट्टीत भाजणे (या भट्टीला आवा म्हणतात) या सर्व मेहनतच्या कामांनंतर स्वत:च त्याची विक्री करणे आणि ती घेणा-याचे किमतीच्या बाबतीतह घासाघीस करणे या सगळ्याच गोष्टी शारीरिक व मानसिकदृष्ट्या कस पाहणा-या असतात. एवढया परिश्रमाने तयार केल्यावर.. "काय एवढी महाग..??? काय सोनं लागलं आहे का..???  जरा किंमत कमी कर..."  अशी बोलणी ऐकायला लागत असतील तर पुढची पिढी या व्यवसायात उतरणार तरी कशी.मग हळूहळू माल नाही म्हणून गि-हाईक नाही आणि गि-हाईक नाही म्हणून माल तयार नाही अशी गत होईल. त्यानंतर अश्मयुगीन आदिमानवाला नागरी संस्कृतीत स्थिरावयाला महत्वपूर्ण भूमिका बजावणारी अन् शतकानुशतके जोपासलेली ही कला अस्तंगत व्हायला कितीसा वेळ लागणार...त्यातही देशी माल दिसायला आकर्षक नाही पण टिकाऊ असूनही 'युज अँड थ्रो' च्या जमान्यात ती प्रत्येक वस्तू 'देशी/गावठी' या नावाने हिणवत त्यांचा वापर करणे टाळतात. त्याऐवजी 'औट घटकेचा' चमचमाट आणि वरवरचा थाट बघून खरेदी करण्याच्या फॅशनमुळे मातीकाम करणारे कलाकार कमी होत गेले. ब्रिटीशांनी आपले साम्राज्य टिकावे म्हणून वापरलेली स्थानिक व्यवसायिकांना संपवून इकडचा कच्चा माल स्वत:च्या देशात नेऊन त्यापासून तयार केलेला पक्का माल जादा किमतीत विकून आपली तुंबडी भरण्याची व्यवसायिक निती आता देशातील कंपन्याही वापरू लागल्या आहेत . बाहेर रस्त्यावर वीस रुपये डझन मिळणाऱ्या पणत्या माॅल मध्ये जाऊन चकचकीत वेष्टनात गुंडाळून आठ ते दहा रुपयाला एक पणती विकत आणून दिवाळी(की अकलेचे दिवाळे) साजरी केलेली असेलच. कंपन्यांनी आणि गल्लाभरू धंदेवाईकांनी कसे पद्धतशीरपणे लोकांचे कसे मनपरिवर्तन केले याबाबत
एक आठवण येथे आवर्जून सांगावीशी वाटते , ती म्हणजे जेव्हा पहिल्यांदा स्टील आले तेव्हा त्याचे न गंजण्याच्या व इतर उपयोगांचे असे काही वर्णन भांडीवाल्याने केले की आईने घरातील चांदीची मोड देऊन स्टेनलेस स्टीलच्या दोन बशा त्याकडून विकत घेतल्या. अजूनही त्या बशांना हात लावताना त्या किती महाग मिळाल्या हे आठवतेच आठवते.पण सोबतच मातीची आणि आपली नाळ तुटली हे ही प्रकर्षाने जाणवते.

  

प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण-  रायगड
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Saturday, November 9, 2019

?????????????????????

का... (देवनागरी)

त्यांना बसू दे ना बाजारात
तुला विकायचे भय कशाला
सौदा तर तुझ्याच हाती आहे
मोलभावाची उगाच चिंता कशाला...

देऊ दे ना त्यांना भरपूर माल
तुला त्याची हळहळ कशाला
घेण्याची जर गरजच नाही
तर देणा-याचा विचार कशाला...

मनावर तुझ्या आहे तुझाच भरवसा
खरेदीदाराची गोष्ट काढायची कशाला
जाणंच नाही ज्या वाटेने
तिचा पत्ता विचारायचाच कशाला...

जाणतात येथे सगळ्यांचेच सगळे
नुसताच देखावा करता कशाला
विकले गेलेत तुम्ही त्या दिवशीच
आता त्याचे ढोल बडवता कशाला...

?????????????????????

कला.... ( आगरी)

त्याना बसू दे नं बाजारान
तुला इकत घेवाची चिंता कला....
सवदा तं तुजेच हातांन हाय नं
मं भाव कराची फिकीर कला...

देवदे नं त्याना जाम माल
त्याची तुला हलहल कला
घेवाची जर जरुरच नाय
तं देनाराचा इचार कला...

मनावर तुमचे तुमचा हाय भरवसा
तं इकत घेनाराची गोष्टच कला
जांवाचा नाय ज्या वाटंला
तिचा पत्ता इचाराचाच कला....

जानतान सगलं आहयां सगल्यांचा खरां
नुसताच देखावा करतांव कला
इकलंव तं तुम्ही त्या दिसालाच
आथा त्याचा गोंगाट भरतांव कला....

????????????????????

क्यूँ... (नागरी)

वो भले बैठे हो बाजा़रमें
तुम्हे बिकने का डर क्यूँ
सौदा तो तुम्हारेही हाथ है
फिर मोल भाव की फिक्र क्यूँ....

चाहे दे दे वे बडा़ माल
तुम्हे उसका मलाल क्यूँ
लेने की जरुरतही नही
तो देनेवाले का खयाल क्यूँ..

दिलपे तुम्हारे तुम्हारा है भरोसा
तो खरीददारों की बात क्यूँ
जब जाना ही नही उस गली में
तो उसके पते की जरूरत क्यूँ....

सब जानते है यहाँ सबका सच
आभास झूठा जताते क्यूँ
बिके तो तुम उसी दिन थे
आज उसका पिटते ढिंढोरा क्यूँ...
=================
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
email - pravin.g.mhatre@gmail.com
!=!==!=!=!=!=!=!=!=!=!=!=!

Monday, November 4, 2019


      ऐरणीच्या देवा तुला...
         
दिवाळीची सुट्टी नुकतीच संपलेली. पण सुट्टीचा रंग अजूनही मनावरून उतरलेला नाही. शाळेत जायचे म्हणजे पॅरोलवर सुटलेला कैदी परत तुरूंगात जाताना जशी अवस्था असेल ,अगदी तशी सर्व बच्चेकंपनीची स्थिती असते. नेहमीप्रमाणेच गुरूजी शाळेत शिकवत असताना निम्म्याहून अधिकांचे लक्ष बाहेर जाणा-या - येणार्‍या रहदारीतच गुंतलेले असते. तब्बल एकवीस दिवसांची सुट्टी कधी आणि कशी संपली हे कुणालाही कळलेले नसते. त्यातच सुट्टीचा म्हणून दिलेला भरभक्कम अभ्यासही थोडा थोडा गाळून पण सर्व अभ्यास पूर्ण केल्याचा आभास करून गुरूजींना गुंडाळण्याचा केलेला प्रयत्न गुरुजींनी पहिल्या नजरेतच उधळून लावल्याने आणि दोन दिवसांच्या वाढीव मुदतीच्या बोलीवर पूर्ण करण्याच्या विचाराने अस्वस्थ होऊन "कशाला दिली होती ती सुट्टी" असा समग्र सुट्टी उपभोगताना डोक्याच्या आसपासही न फिरकलेला विचार आता मात्र डोक्याचा अक्षरशः 'गोविंदा' करत असतो. अशातच समस्त शिष्यवर्गाची अभ्यासाबाबतची आवड आणि तळमळ जाणून असल्याने तसेच त्यांचा वकूबही जाणून असणा-या गुरूजींनी गेल्या तीन आठवड्यांत सगळयांच्याच पाटया को-या झाल्या असणार,  किंबहुना थोडाफार विस्मरणाचा गंजही चढलेला असणार हे माहित असल्याने पाढे पाठांतराचा हूकूम सोडून एक तासाची डेडलाईन देऊन त्यांनी आपल्या लेखी कामात आपली मान घातलेली असल्याने आणि काही केले तरी पाढयांना आपल्या डोक्यात घुसण्याचा मार्ग सापडण्याची शक्यता अंधूक असल्याने पाढे पाठांतर करण्याऐवजी टंगळमंगळ करण्यात शाळेच्या छपराची कौले, खिडक्यांचे गज, अगदी समोरच्याच्या शर्टाला पाठीवर पडलेले डाग (कधीकधी भोकं ही) मोजून झालेली असल्याने बाहेर लक्ष घोटाळत राहते.
         अशातच शाळेच्या मैदानाच्या एका कोपऱ्यात काहीशी लगबग सुरु झालेली असते. एक लोहारदादा त्याचे बि-हाड घेऊन आलेला असायचा. त्याचीच सामान लावायला सुरुवात झालेली असायची.  एवढा वेळ पाठांतराचा नुसता अभिनय करणारे सर्वजण खिडकीकडे धावून खिडकीच्या गजांवर चढून तिकडे पहात गलबला करायला सुरुवात झाल्यानंतर गुरुजीही मान वर करून एकदा टेबलावरचा रूळ आपटून वर्गात शांतता प्रस्थापित करण्याचा एक निष्फळ प्रयत्न करतात. पण आपल्यातच गुंग असलेल्यांना तो आवाज ऐकूही गेला नाही.नाईलाजाने त्यांना आपले काम सोडून उठावे लागते. ते उठलेले पाहताच सगळी पाखरे पटापट आपापल्या जागेवर जाऊन बसतात.वर्गात पुन्हा अस्वस्थ शांतता पसरते. हळू आवाजात कुजबूज करत नजरेनेच एकमेकांना खुणावत असतानाच घंटेचा टण्णटण्ण आवाज कानावर पडतो. पाखरांनी भरलेल्या झाडावर कोणी दगड मारला तर ती जशी फुर्रकन उडतात तशीच सर्व मुले वर्गाबाहेर पडली. सगळा घोळका लोहार उभारत असलेल्या तंबूजवळ पोहोचला.एव्हाना त्याने चार पहारी चार कोप-यांना ठोकून मध्ये एक काठी उभी केलेली होती आणि त्यावरून तंबूची कनात  ओढून घेऊन तिचे चार कोपरे ठोकलेल्या पहारींना ताणून बांधलेले असतात.तंबू तयार झाल्यावर एक छोटा खड्डा खणून त्यात भाता बसवून घेतो व नंतर पुढे थोडया अंतरावर खड्डा खणून ऐरण पक्की बसवून घेतो. या  सगळ्या कामात आजूबाजूला जमलेले छोटे प्रेक्षक आणि त्यांची लुडबूड,ढकलाढकली यांमुळे अडथळा येत असल्याने मध्येच त्यांच्यावर ओरडत बाजूला होण्यास सांगत होता. इतक्यात शाळा भरल्याची घंटा वाजते. सगळे वर्गात जातात अर्थात दोनचार टाळकी अजूनही घुटमळत असतातच, पण गुरूजींनी आवाज दिल्यावर नाईलाजाने तेही वर्गात जातात. त्यानंतर शाळा कधी सुटते याकडेच लक्ष असल्याने वारंवार खिडकीकडे पहातच वेळ जातो आणि एकदाची शाळा सुटल्याची घंटा वाजताच. बाहेर काढलेली पाटी - पुस्तक दप्तरात भरतच धाव ठोकतो ते थेट तंबूजवळ थांबायला जातो. आता भाता सुरु केलेला असतो पण त्याच्या आगीवर ठेवलेले असते एक बारा ठिकाणी चेपलेले, पोचे आलेले पातेले... आणि त्यात शिजत असते डाळतांदूळ एकत्रच घातलेली खिचडी. त्याची मुले ती कधी शिजते आणि खायला मिळते याकडे आशाळभूतपणे पहात बसलेली असत... कदाचित दिवसभरात त्या बिचा-यांच्या पोटात काही गेलेले नसावे. गडबड करणा-या पोरांना तो लोहार जवळजवळ हाकलूनच लावतो. नाईलाज म्हणून आणि दिवसभरातून घरी जायचे असल्याने ती सगळी घरचा रस्ता धरतात.
                 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच येऊन सर्व मुले त्या तंबूभोवती गम्मत पहात उभी असतात. आता मात्र लोहारदादाला त्यांच्याकडे लक्ष दयायला वेळ नसते, तो आपल्या कामात गर्क असायचा. त्याची घरवाली भाता हलवत स्वत:च्याच तंद्रीत बसलेली असायची. तिलापाहून 'साधीमाणसं' चित्रपटातील
           " ऐरणीच्या देवा तुला
            ठिणगी ठिणगी व्हाऊ दे
           आभाळागत माया तुझी
           आम्हांवर -हाऊ दे..."
असे म्हणणारी जयश्री गडकर डोळयासमोर तरळून जायची. ऐरणीच्या देवाची आभाळागत माया हयांना मिळत असेल की नाही ही शंकाच आहे, पण आभाळाच्या मायेच्या छताखाली आयुष्यभर झोपावे लागते हे मात्र खरे....डोळयासमोर साक्षात बसलेली जयश्री गडकर आणि तिचा अवतार एकदम पाहण्यालायक असायचा, तोंडावळयावरून  मूळ सुस्वरूप असल्याचे जाणवत असूनही कित्येक दिवस अंगाला पाणी लागले नसावे असे मळकट ध्यान , केसाचा पिंजरा आणि सतरा ठिकाणी ठिगळं लावलेले दोन तुकडे जोडून तयार केलेले पातळ .नेहमी मनात विचार यायचा की कपडयांचे ठिक आहे, नसतील परवडत पण बाकी स्वच्छ रहायला काय हरकत असावी. पण जेव्हा खरे कारण समजले तेव्हा मात्र बसलेला धक्का खूप मोठा होता.त्याचे कारण असे होते की अशा भटकंती करणा-या आणि उघडयावर संसार असणा-या समाजातील स्त्रिया आपल्या रक्षणा करता जाणूनबुजून तशा रहात. गावात सुया-दाभण,बांगडया विकायला येणाऱ्या गोसाविणींच्या काळया दातांचे रहस्यही तेच होते. जास्तीत जास्त कुरूप दिसण्यासाठी त्यांचा प्रयत्न असे.
          आगीत लालभडक झालेले लोखंड चिमट्याने पकडून ऐरणीवर ठेवून लोहारदादा तिला काही तरी बोलतो.तोंडातील तंबाखूच्या तोब-यामुळे तो काय बोलला हे कोणालाच समजत नाही पण ती मात्र लगेच भात्याची दोरी सोडून पटकन उठून उभी राहते, शेजारी पडलेला घण उचलते आणि त्या रसरशीत लालबुंद लोखंडावर दणादण घाव घालायला सुरुवात करते. शून्यात नजर ठेवून बसलेल्या तिला पाहून एवढी ताकद तिच्या अंगात असेल असे वाटतच नव्हते. हळूहळू तो लोखंडाचा तुकडा आकार घेऊ लागतो.  कोयता, विळा असे वळण घेतो, अर्थात ते तापवून लालभडक करणे व घणाचे घाव घालणे या क्रियेची चारपाच आवर्तने झाल्यावरच. मनाजोगते तयार झाल्यानंतर त्याला पाणी दयावे लागे. पाणी देणे म्हणजे गरम असतानाच लगेच पाण्यात बुडवून ते थंड करणे. असे केल्याने त्याचा कठिणपणा वाढतो व धार जास्त काळ टिकते. त्यानंतर धार लावून त्याला लाकडी मूठ (थरव) बसविले जाते.  ती मूठ बसवताना पाहणे हेही बघण्यालायक असे.पण खरी एकाग्रता पहायला मिळायची ती विळयाला धार लावतानाच.  खरं पाहता हे दिवस शेतीच्या कापणीचे. शेतात भाताचे पिक कापणीसाठी तयार  झालेले असायचे. कापणीसाठी विळे आवश्यकच अन् तेही धारदार हवेत. त्यामुळे गावकरी विळयांना धार लावायला येणार हे वर्षानुवर्षांच्या अनुभवाने माहित झाल्यानेच तर तो गावात आलेला असायचा. विळयाला धार लावणे हे खरे कसब,  कारण त्याचे बारीक बारीक दात नीट योग्य वळणासह धार देउन तयार करणे सोपे नसायचे . त्यासाठी आधी धार लावायची आणि मग नंतर तो विळा पायात पकडून काणस घेऊन एक एक बारीक दाता पाडत जायचा, सरळ भागावर सरळ त्रिकोणी आणि जसजसे वळण येईल तसे त्या वळणाला अनुसरून दाता तिरका करत जायचे हे काम अगदी तल्लीन होऊन तो करत असे.मध्येच डोळयासमोर पकडून एक डोळा मिटून दुसऱ्या डोळयाने दाते आणि धार ठीक असल्याचे पहायचा हे पाहताना गंमत वाटायची. पण मोठया माणसांना त्याच्या श्रमाची किंमत वाटत नसे  ते धार लावून घेतल्यानंतर पैसे देताना कुरकुर करत. एखाददुसरा विनाकारण शिव्याही दयायचा.  तसे लोहारदादाची शरीरयष्टी पाहता त्या माणसाला तो एका हाताने उचलून सहज पंधरा फूट फेकून देऊ शकेल असे वाटायचे, पण तो मात्र कधी हसून तर कधी दुर्लक्ष करून वेळ मारून न्यायचा.  काय करणार??  प्रश्न त्याच्या आणि कुटूंबाच्या पोटाचा असायचा तेथे मनाला आणि रागाला मुरड घालावीच लागते हे बारा गाव हिंडणारा लोहारदादा जाणून असायचा. 
      एवढया वेळात शाळा उघडून प्रार्थनेची घंटाही झालेली असायची.  सोबत गुरूजींनी मारलेली हाकही ऐकू यायची.  मग तो रूपाने काळाकभिन्न ,आडदांड असलेला लोहारदादा मुलांना लटक्या रागाने म्हणायचा " जा बाबांनो जा शाळेत, इथे काय बघून मिळणार तुम्हाला ????  चार बुकं शिकाल तर आरामात सावलीत बसून कमवाल..जा... " मुलंही निघून जायची. दोनतीन दिवसानंतर संध्याकाळी कधीतरी तो आपले बस्तान उचलून दुसऱ्या गावी जायचा.  त्या जागी उरलेल्या असायच्या ठोकलेल्या पहारींच्या आणि भाता पेटवलेल्या आगीच्या राखेच्या खुणा.....  सोबत मनात घुमत राहणारे त्याचे बोल "चार बुकं शिकाल तर सावलीत बसून कमवाल..."
शिक्षणाचं महत्त्व एक निरक्षर,अनाडी माणूस किती चपखल शब्दात सांगू शकेल याचे यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण नसावे बहुतेक....
 
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Wednesday, October 16, 2019


परतीचा पाऊस
सकाळपासून दुपारपर्यंत उन्हाचा कडाका एवढा , की अक्षरशः कातडी भाजून काढणे हा शब्दसुद्धा अंगाची काहिली वर्णन करायला कमी पडावा.  पाण्याचे शेकडो झरे उमाळे फुटून वाहू लागल्यासारखे वाटावे अशा घामाच्या धारा लागलेल्या .त्या पुसून पुसून हातरूमाल आणि शर्टच्या बाहया संपृक्त अवस्थेला पोहोचलेल्या. चेहरा लालबुंद होऊन त्याची आग-आग होऊ लागलेली. अंगातले कपडे अंगाला घट्ट चिकटून बसलेले. सगळयांच्या तोंडी फक्त सुस्कारे. प्रत्येकजण नुसता हाशहुश्य करत बसलेला.  पंख्याखाली बसुनसुद्धा गारव्याऐवजी पंखा वाफा टाकत असल्यासारखा गरमागरम हवा सोडत असलेला. काय करू , कुठे बसू असे प्रत्येकाला झालेले. अशातच आकाशाचा रंग पालटू लागतो. पांढरे कापसासारखे ढग जाऊन हळूहळू काळेकाळे ढग जमा होऊ लागलेले. क्षितिजावर दूर कुठेतरी विजेची रेषा चमकून गायब झालेली दिसू लागते. पावसाची चिन्हे दिसू लागली , की येणाऱ्या गारव्याच्या कल्पनेने जीवाला मनातून गारवा आल्यासारखा वाटतो.
             पण शेतावर काम करणाऱ्या शेतक-याच्या मात्र पोटात गोळा उठतो. गेले चारपाच महिने मेहनत केलेले वर्षाचे हाती लागणारे भाताचे पिक आताच कापणी करून शेतात नीटपणे आडवे पसरून ऊन खायला पसरून ठेवलेले असते. ते आता भिजणार या कल्पनेनेच त्याचा जीव वरखाली होऊ लागतो. एकमेकांच्या सुचना देत, कधी रागवत घाईघाईने हात चालायला लागत. काय करावे सुचत नाही .मग मात्र शक्य तेवढया चपळाईने भाताचे भारे बांधायला सुरवात करत. ते तेवढयाच घाईघाईने गावाशेजारी तयार केलेल्या खळयावर आणून त्याचे ऊरवे रचले जाई. आजूबाजूला पडलेला, राखून ठेवलेला हाताला लागेल तेवढा पेंढा त्या ऊरव्यावर टाकून ते झाकून टाकले जात असे. खरंतर पावसापुढे पर्यायाने निसर्गापुढे काही चालणार नाही , याची खात्री असूनही जिवाच्या आकांताने  सारी धडपड सुरु होत असे. एकदा का पाऊस सुरु झाला की मग सा-या आसमंताचा नूरच पालटून जायचा. टपटप करत करत मोठमोठाले थेंब पडायला सुरूवात होते न् होते तोच सोबतीला विजेचा चाबूक आणि ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाचा रथ धो धो पाऊसधारांत ऊधळत सगळे चिंबचिंब करून जसा आला तसाच निघून जायचा. आलेले मळभ दूर व्हायचे. क्षितिजाच्या रेषेवर मात्र विज लवलवत आकाशाच्या पाठीवर सळ्कन् रेघोटी मारून गायब होत असते. ढगांआड गेलेला सूर्य आपला मुखडा ढगांच्या आडून बाहेर काढायला सुरुवात करतो. पण तोही आता पिवळयाधम्मक तेजाऐवजी तांबूस-लालसर  लालीमध्ये मलूल पडून मावळती जवळ करू लागलेला असायचा.  शेतकरी हवालदिल होऊन फक्त चिंताग्रस्त होऊन घरातल्या दो-या सैल झालेल्या बाजेवर बसून विचारात पडलेला असायचा.  मती गुंग होणे म्हणजे काय हे त्याची ती अवस्था पाहून सहज लक्षात येत असते. मनातून सारखे वाटत असते की,  जावं आणि ती पेंढयाने झाकलेली ऊरवी उघडून नेमके किती भिजले आहे याचा अंदाज घ्यावा.पण लगेचच दुसरे मन वस्तुस्थितीची जाणीव करून देते. संध्याकाळ होत आलेली असते. रविराज आपल्या शयनकक्षाकडे पाऊल पाऊल करत चाललेले असायचे.त्यातही आपण वरचा पेंढा काढला आणि रात्री पुन्हा पाऊस आला तर काय होईल ही सार्थ भिती असायचीच. मग तो रात्रभर तसाच अंथरुणावर पडलेला असतानाच दिवसभराच्या श्रम आणि धावपळीने दमल्यामुळे कधी झोपी जात असे.
            दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणे डोंगराआडून वर येण्याआधीच हा खळे गाठायचा. ऊरव्याच्या सर्व बाजूंनी गोलगोल  फेरी मारून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत असे. हळूच एका बाजूने वर चढून एक एक करत भाताचे भारे खाली उतरवून घेई .  इतर गडीमाणसे येण्यापूर्वीच स्वत: कामाला लागलेला असायचा. डोळयात अश्रू तरळून गेलेले असत, पण हातातोंडाशी आलेले पिक सुरक्षित घरी पोहोचावे हीच मनोमन इच्छा मनातल्या मनात देवासमोर साकडं घालत असे.पुन्हा कालच्या वातावरणाचा प्रत्यय येण्या अगोदर मळणी, ऊफणणी ऊरकून गोणी भरुन ठेवावी असेच वाटत असेल . झोडून जमा झालेला धान्याचा ढीग एकाबाजूला करून थोडे थोडे सुपात भरून वा-याची दिशा पाहून खाली सोडून केर कचरा साफ करून सुंदरसा कंसाकृती कणा आकाराला  येत असे. तो उंच उंच बाळसे धरू लागतो. तोच आकाशात काळा काळा कापूस पिंजायला सुरुवात झालेली असायची. मग पुन्हा धावपळ सुरू... घाईघाईने पोती एक लाकडी खोक्याच्या मदतीने ज्याला फरी म्हणतात, त्या फरीनेच भरली जात. मोजमापाचीही अनोखी रीत.  दर फरीला पोत्यात भरलेल्या भाताची एक मूठ भरुन बाजूला जमिनीवर छोटीशी रास करायची. प्रत्येक वेळी एक करत करत या राशींच्या उभ्या आडव्या ओळी तयार होत. यातील प्रत्येक राशीला फसकी म्हणतात .सर्व भात भरून झाले की फसक्या मोजल्या जात. मोजताना सुरवात करताना 'एक' या अंकाने न करता पहिली फसकी 'लाभ' व नंतर पुढे दोन,तीन,चार असे. मोजत.एव्हाना आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून थेंब थेंब झरू लागलेले असायचे . सर्व उरकून समाधानाने घर गाठताना पाऊसही आपला बँड-फटाके वाजवत धो-धो कोसळू लागायचा. आता मात्र एक समाधान असायचे, कारण एवढे तरी पिक घरात आलेले आहे.
           काही वर्षांपासून मात्र लोकांनी ही धावपळ करणे सोडून दिल्याचे जाणवते.आताशा लोक परतीचा पाऊस पडायची चिन्हे दिसू लागताच जर जवळ मोठी ताडपत्री किंवा मोठा प्लास्टिकचा कागद असेल तर शेतातल्या शेतातच मळणी सुरू करतात. जेवढे शक्य तेवढया वेगाने पिक पोत्यात भरून घरी आणतात. ना कणा ना फसक्या. फक्त पिक आले बस  झाले अशीच मानसिकता राहिली आहे. अर्थात ती तरी किती दिवस टिकणार आहे,  कारण शेत पिकवणारी जमात लवकरच नामशेष होणार..... शेती जाणार,  तिथे मोठमोठे इमले उभे राहणार .....शेतक-याची धांदल उडवून मनात हसणारा परतीचा पाऊस त्या इमल्यांवरही पडणार ,पण तो उघड पहायला कोणीच नसणार. सगळे सुरक्षित बंद काचांआडून त्रयस्थपणे पाहत राहणार.....
प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण- रायगड
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Sunday, October 6, 2019



पाटीपूजन...
"दसरा सण मोठा
नाही आनंदाला तोटा....."
अगदी लहानपणापासून हे वाक्य सतत ऐकत आलो आहे आणि लहानपणी तर दसरा हा सण कधी यायचा अन् कधी जायचा हेच कळायचेच नाही. एकतर संपूर्ण वर्षातले गणेशोत्सव, सर्वपित्री अमावास्या आणि होळी एवढेच काय ते सण उत्सवी आणि उत्साही वातावरणात साजरे केले जात. बाकी उरलेले सण अक्षरश: 'उरकले' जातात. दस-याच्या बाबतीत काही वेगळे नसायचे. महत्त्वाचा सण गणेशोत्सवाची उस्तवारी अन् उसनवारीही अंगावर झालेली असायची .त्यातच आपल्या सर्व पितरांच्यासाठीचा भावनिक संवेदनशीलतेचा सण म्हणून सर्वपित्री अमावास्याही औकातीबाहेर जाऊन साजरी केलेली असायची. या सगळ्यात शेतीची कामे खोळंबलेली असायची. परतीच्या पावसाने हस्ताच्या साथीने शेतातील भाताच्या पिकाला शब्दशः लोळवलेले असायचे.  पाऊस जातो कधी आणि तयार झालेल्या पिकांची कापणी-बांधणी करतो कधी असे प्रत्येकाला झालेले असायचे.  डोळयासमोर शेत,भात, विळे, बंध हेच नाचत असल्यामुळे दसराच काय दिवाळीही  दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी घरी परतल्यावर पुढच्या दिवशीच्या तयारीतच साजरी होत असे. खरे वाटणार नाही पण सत्य हे आहे की भाऊबीजेला बहीण भावाची वाट बघत घरी बसत नसे, तर घरातील आपल्या लहानग्यांच्या किंवा त्यांना घरी सांभाळण्यासाठी थांबलेल्या, वयोमानानुसार शेतीची अवघड कामे करणे शक्‍य होत नसलेल्या म्हातारा-म्हातारीच्या जवळ "भाऊ आला की मला निरोप दया" असे सांगून शेत गाठत असे आणि इकडे भाऊही सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा भाऊबीज उरकता कशी येईल यासाठीच प्रयत्न करायचा. मग अशा या गडबडीत दसरा कसा साजरा करणार ...?
पण शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी मुलामुलींना मात्र याची ओढ असायची आणि त्याचे कारण शाळेत केले जाणारे पाटीपूजन. सर्व शाळांमध्ये गुढीपाडवा आणि दसरा या दोन दिवशी विदयेची देवता सरस्वतीचे पूजन करण्याची पद्धत आहे. ज्या पाटीवर ज्ञानाचे धडे गिरवतो ती पाटी हेच सरस्वतीचे रुप मानून त्याच पाटीवर सरस्वती यंत्र काढून तिचे पूजन केले जात असल्याने या कार्यक्रमाला पाटीपूजन म्हणूनच ओळखतात.
  पाटीपूजनाची पूर्वतयारी आदल्या दिवशीच शाळेत सुरू होत असे. गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना पाटी धुवायला सांगत. पाटीवर सरस्वती यंत्र (प्राथमिक शाळेतील सर्व वर्षे मी हीच सरस्वती समजत होतो) कसे काढायचे हे फळयावर मराठी एक एक काढून त्यातून छानपैकी यंत्र काढत. सोबत पूजेचे साहित्य आणायच्या सूचना देत असत. सर्वच मुलांची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने प्रसादासाठीच्या नारळासाठी सगळयांना पाच-दहा पैसे आणायला सांगत. तेही सर्वांनाच मिळणार नाहीत याची खात्री गुरूजींना असल्याने त्यांनीही वरचे पैसे भरायची तयारी ठेवलेली असायची, त्याकाळी गुरुजींचाही पगार हातात पडल्यापासून जेमतेम सात- आठ दिवस खिशात टिकण्याएवढाच असल्याने महिन्याच्या शेवटची तारीख असेल तर पैसे आणण्याबद्दलचा दबाव जरा जास्तच असायचा. पहिल्या तारखेच्या आसपास असेल तर मात्र थोडी सवलत असे. शाळाही अर्धा एक तास लवकर सोडत असत.मग एकदा घरी पोहचलो की दप्तरातील पाटी बाहेर पडे आणि बाकी दप्तराची पिशवी एखाद्या कोपर्‍यात ठेवून दिली जायची. पहिला मोर्चा वळायचा चुलीकडे. चुलीतली राख चिवडून त्यातून ब-यापैकी मोठा कोळसा शोधून काढला जाई. पाटी दगडी स्लेटची असल्याने ती पाणी टाकून कोळशाने घासून अगदी स्वच्छ काळी कुळकुळीत केली जायची. फडक्याने पुसून कोरडी केली जायची. मग ती पाटी घेऊन घरातील वडीलधा-यांकडे जायचे. गुरुजींनी शाळेत जरी सरस्वती काढायला शिकवली असली तरी स्वच्छ केलेल्या पाटीवर आपल्या अफलातून कलाकारीवर विश्वास( बहूदा अविश्वासच) असल्याने स्वत: काढायची हिम्मत करत नसत. आधीच कामाच्या धबडग्यात दमलेले असूनही कोणीतरी सरस्वती काढून देत.  आधी ११११११११ काढून त्यातून तिरक्या रेषा मारत पुन्हा वर आणून एकत्र केल्या जात असत.  वर मोठया अक्षरात "श्री गणेशाय नम:" लिहले जायचे खालच्या बाजूला एकीकडे चंद्र आणि दुसरीकडे सूर्य काढला जायचा. त्यानंतर ती पाटी अगदी जपून ठेवली जायची. सकाळी लवकर उठून आंघोळ उरकून कपडे करून शाळेत जायची तयारी केली जायची. हातात पाटी पाटीवर हळद व कुंकवाच्या लहान पुडया, तांदळाची पुडी, दोन अगरबत्त्या , पाच पैशाचे नाणे आणि झेंडूची फुले असे सगळे कसरत करत सांभाळत शाळा गाठायची.शाळेत आधी प्रार्थना व नंतर सरस्वती देवीच्या प्रतिमेची पूजा केली जायची आणि मग पाटीपूजन करण्याचा आदेश मिळाला की,झेंडूची फुले कुस्करून परवून त्यावर हळद कुंकू वाहिले जायचे. त्याचवेळी कुणीही अगरबत्ती पेटवू नये असे गुरुजी सांगत आणि एका मुलाला तांदूळ व अगरबत्ती गोळा करायला सांगत. मग रांगेने सरस्वती प्रतिमेला नमस्कार करायला सांगत. नमस्कार करताना सोबत आणलेले पैशाचे नाणे देवीसमोर ठेवत. पूजा पुर्ण झाल्यावर जमलेल्या पैशातून नारळ आणायला कुणाला तरी पिटाळले जायचे.यावेळी जरी एकाला पाठवलेले असले तरी त्याच्यासोबत दोनचार जण तरी आधीच धावत पुढेच निघत. एकदा का नारळ आणला की त्याचे उपस्थिती बघून लहान तुकडे करून प्रसाद वाटला जायचा.मग सुट्टी.घरी परतल्यानंतर पाटीवरची फुले दारासमोरच्या तुळशीत टाकून नमस्कार केला जायचा.
  आता स्लेटची पाटीच राहिली नाही.त्या ऐवजी वही किंवा पुस्तकाचे 'पाटीपूजन' केले जाते.स्वरुप बदलले तरी परंपरा टिकून आहे हेच काय ते समाधान...
प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण,रायगड
मो. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Friday, October 4, 2019


        
आसंचे नये दिशी...
आसंचे नये दिशी,
  आंबा बाहेर निघाली
नेसली सोनशेला,
       गेली कोकण पाहयाला
           नाय पिकला कोकणू.......
   अश्विन महिन्याच्या सुरवातीला गावातील वयस्कर महिला, आया, आज्या लहान मुलांना थोपटवून झोपवताना हे गाणे पूर्वी म्हणत असत. खरंतर ही आंबा कोण ? ती कोकणच का पहायला निघते आणि नेहमीच कोकण कसे पिकलेले नसे ???  हे आणि असेच काही प्रश्न पडत असत. विचारले तर त्याची उत्तरेही मिळत परंतु ती डोक्यात शिरत नसत. उलटपक्षी गोंधळात भरच पडत असल्याने ही उत्तरे शोधण्याचा नाद सोडून दयावा लागे. मात्र त्यातील आंबा म्हणजे देवी असते हे कायमस्वरूपी लक्षात राहिले. पण यातही एक गमतीचा भाग असा होता की नवरात्रीतील देवी म्हणजे फक्त भगत-भगतीनींची पर्यायी ज्यांच्या अंगात येते त्यांचीच असा समज असल्याने व अशा अंगात येणाऱ्या ,घुमणा-यांची भितीच वाटत असल्याने या देवीचीही भितीच वाटत असे. देवीचा कोप होईल किंवा जर ती आपल्याच अंगात आली तर काय घ्या ....असे वाटत असल्याने ही कोकण पहायला निघणारी आंबा झोप आणण्यापेक्षा झोप उडवणारीच वाटायची.
            पण हळूहळू जसजसे मोठे होत गेलो तसे या गाण्याचा अर्थ कळू लागला. यातील कोकण म्हणजे कोकण विभाग असा अर्थ नसून पिकलेले शिवार असा आहे मात्र या भागाशी संबंधित हे गाणे असल्याने तसा उल्लेख असावा , त्याचप्रमाणे यावेळी घटासोबत धान्य रूजवले जाते त्याचाही संबंध आहेच. जणूकाही घटासह लागणारे धान्य , वस्त्र गोळा करण्याची जबाबदारी स्वत: देवीनेच स्विकारली आहे आणि तीच एक एक करत माळी, शिंपी अशा त्यावेळच्या बलुतेदारांना भेटायला निघत असते.पण त्याचबरोबर त्याकाळातल्या दुष्काळी परिस्थितीचे अप्रत्यक्ष वर्णनही आलेले दिसते. खरे पाहता या दिवसांत वातावरण पिकांच्या व गवताच्या वाढीसाठी खूप पोषक असते ,  लोक असे मानतात की या नऊ दिवसांत शेताच्या बांधावर वाढणारे दर्भासारख्या बेर नावाच्या गवताच्या नऊ गाठी म्हणजे नऊ पेरं वाढतात .वास्तविक वाढ एवढी नसली तरी गवताच्या वाढीचे प्रमाण आणि वेग खूपच जास्त असतो हे मात्र निश्चितच खरे आहे. हे जसजसे उमजू लागले तसतसा नवरात्र हा सण आवडू लागला. वर म्हटल्याप्रमाणे गावात नवरात्रीत घटस्थापना  ही जे भगत-भगतीनींची आणि काहीशी देवदेवस्कीची कामे करत किंवा ज्यांच्या अंगात कुठलीतरी देवता येते असे लोकच करत असल्याने, तसेच मध्यरात्री बाराच्या ठोक्याला त्यांचे ते अंगात येणे व घुमणे यामुळे नवरात्री फारच गूढ वाटत. बरं देव 'बसवलेले' असल्याने देवळात घंटा वाजवून कोणी त्यांना उठवू नये म्हणून घंटेचे लोलक किंवा पुर्ण घंटाच बांधून ठेवलेली असे.त्याचबरोबर काहीजण  लहान मुलांना घाबरवण्यासाठी सांगत की नवरात्रीत सगळे देव 'बसत'  असल्याने ते एकाच जागी अडकून राहत असल्याने याकाळात भूते जास्त शक्तीवान बनतात. बरं ते भूत उतरवणारे भगत पण 'बसलेले' असल्याने भूत उतरवणार कोण ???  हा यक्षप्रश्न असल्याने भितीत भरच पडायची.  पण भिती जरी वाटत असली तरी जागरणाची आवड असल्याने रात्री बारापर्यंत जागत बसत असत. पण नंतर रात्रीच्या काळोखात स्वत:चे घर गाठताना जो काही जिवाचा थरकाप उडायचा आणि जिवाच्या आकांताने कसे धावत जावे लागायचे ते शब्दांत सांगून तसे कळणे अशक्यच .तो अनुभवायलाच हवा. आता मात्र भूतेखेतं काहीच नसते, असतो तो आपल्या मनाचा खेळ .हे कळल्यावर तोच अनुभव गंमतीदार वाटतो आणि हसूही येते.
         काळ बदलत गेला तसा नवरात्रीचे स्वरुपही बदलत गेले. महाराष्ट्रातील घटस्थापनेच्या बरोबरीने देवीची मूर्ती आणून पुजा होऊ लागली. वेगवेगळी मंडळे तयार झाली. नवरात्र हा इव्हेंट बनू लागला. त्यातच दूरदर्शन/मेट्रो ऐवजी मोठमोठया डिशचे केबलचे जाळे पसरू लागले. शेकडो चॅनल्स आली. टेपरेकॉर्डरचा जमाना जाऊन कॉम्पॅक्ट डिस्क (C.D.) चा जमाना आला.  फाल्गुनी पाठक सारख्या गायक गायिकांनी गुजराती दांडिया महाराष्ट्राच्या गळी उतरवलाच पण त्याला खरे खतपाणी घातले ते ABCL ने दोनेक वर्षांसाठी का होईना आयोजित केलेल्या "स्टारट्रेक" च्या ग्लॅमरने. आता तर सगळीकडे मोठमोठ्या गरबा नाईटसचे इव्हेंटच असतात. घटाची स्थापना केलेली असते पण कुठेतरी एका कोपर्‍यात .कटू असले तरी सत्य हे आहे की, देवीसुद्धा नावापुरतीच आणली जाते.देवळातली घंटा वाजवू नये याची काळजी घेणारे देवीसमोर डिजे लावून दणदणाट करत नाचत असतात. मनातील भाव कधीच संपला ,शिल्लक राहिलेत ते मोठमोठ्या फ्लेक्सवर झळकणारे व भाव(सोबत देणगी रुपात मिळालेला मालही) खाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेणारेच भक्तीचा लवलेशही नसतो. सगळयांचे लक्ष असते फक्त गरबा-दांडियाकडेच. ....भले लावलेल्या गाण्यातल्या एकाही शब्दाचा अर्थ तर सोडाच पण तो शब्द तरी काय आहे हे माहीत नसले तरी. ठेका धरायला तयार असतात.....भले मग आयुष्याचा ठोका चुकला तरी चालेल....
प्रविण म्हात्रे
पिरकोन,उरण,रायगड
मो.नं. 8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Wednesday, September 25, 2019

चला चिरनेरला..हुतात्म्यांच्या आठवणी जपायला.....
             
उरण तालुक्यातील चिरनेर हे गाव या दिवशी एका वेगळयाच आवेशात , उत्साहात आणि तेवढयाच लगबगीत असल्याचे दिसते.गावातील महागणपतीच्या सुप्रसिद्ध , जागृत देवस्थानामुळे हे गाव तसे दर संकष्टी चतुर्थीला येणा-या भाविकांमुळे दरमहा एक दिवस गजबजलेले असते . पण 25 सप्टेंबरच्या सकाळी मात्र हेच गणेश मंदिर आणि परिसर देवभक्तीमय नव्हे तर देशभक्तिमय वातावरणात बुडालेला दिसतो, कारण या गावाला आणि या मंदिराला जसे धार्मिक महत्व आहे तेवढेच ऐतिहसिक महत्वही आहे. याच ऐतिहासिक घटनेचे स्मरण आणि हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी सगळे लोक येथे जमलेले असतात.
           25 सप्टेंबर 1930 रोजी इंग्रज सरकारने लादलेल्या जंगलबंदीला विरोध करण्यासाठी परिसरातील लोकांनी *सविनय कायदेभंग* करून जंगलात घुसण्याचे ठरवले . अनेकांची उपजिविका ज्यावर अवलंबून होती .त्या जंगलात जाण्यास, सरपणासाठी लाकूडफाटा तोडण्यास मज्जाव असल्याने चिडलेल्या या लोकांनी कायदा मोडायचा असे ठरवून सर्व लोक अक्कादेवीच्या डोंगरात जमले.तेव्हा झालेल्या गोळीबारात आठजण नागरिक व एका मामलेदारासह पाच सरकारी सेवक हुतात्मा झाले तर चौदाजण जखमी झाले आणि सत्तेचाळीस जणांवर खटला भरण्यात आला .त्याचा हा स्मृतीदिन प्रथम  1931 साली साजरा केला तो *सेनापती बापट* यांनी .मात्र नंतर थोडा दुर्लक्षित राहिलेला हा कार्यक्रम 1957 पासून शासकीय स्तरावरून जिल्हाधिका-यांच्या अखत्यारीत साजरा केला जाऊ लागला. *शंकरराव चव्हाण*(1975) , *शरद पवार* (1989) , *बँ.अंतुले*(1981) , *मनोहर जोशी* (1997) अशा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
( _योगायोगाने पुढील वर्षीचा स्मृतीदिन येण्याआधी नामदार शरद पवार वगळता सर्वांचे पद गेले असे सांगतात_ )
         आठ हुतात्म्यांमध्ये हुतात्मा नाग्या कातकरी प्रत्यक्ष चिरनेर अक्कादेवीचा असूनही थोडा उपेक्षितच राहिला .अगदी स्मृतीस्तंभावरही त्याचे नाव सुरूवातीला नव्हते .विशेष म्हणजे चार दिशांना वंदे मातरम् च्या चार पाटया व सात हुतात्म्यांसह पाच सरकारी सेवकांची नावे या स्मारकावर होती पण *नाग्या महादू कातकरी* यांचे नाव मात्र नव्हते.पण 23 जानेवारी 2003 रोजी निवडणूक अचारसंहिता असल्याने गाजावाजा न करता शासनाच्यावतीने सायंकाळी 5.30नंतर नावाची पाटी लावली व त्यांना न्याय मिळाला .म्हणूनच तर 25सप्टेंबर 1930 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढयातील एक महत्वपूर्ण दिवस मानला जातो. याच दिवशी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध अगदी तळागाळातील, साध्यासुध्या आगरी,  कोळी, कातकरी  जनतेने सत्याग्रह केला. चिरनेर, दिघोडे, मोठीजुई, धाकटीजुई, कोप्रोली, पाणदिवे आणि अशाच आजुबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येऊन हा लढा दिला .कारण त्यांचे पूर्ण जीवनमान,  त्यांचा उदरनिर्वाह ज्या जंगलावर अवलंबून होते त्या जंगलावरचा त्यांचा हक्क, त्यातील झाडांझुडपांपासून मिळणाऱ्या सरपणाचा लाकूडफाटा तोडायला त्यांना बंदी केली होती.एकंदरीत त्यांच्या पोटावरच पाय देण्याचेच काम जुलमी इंग्रजांनी केले होते.  गरीब असला म्हणून काय झाले, पण एकदा का कोणी आपल्या जगण्यावरच जर बंधने आणत असेल तर त्याचा उद्रेक हा  निश्चित होत असतो. चिरनेरचा जंगल सत्याग्रह याचेच उदाहरण म्हणता येईल.  मूळ सत्याग्रह चिरनेरजवळ असलेल्या अक्कादेवी डोंगरावर झाला. पण त्यानंतर सत्याग्रहींना चिरनेरच्या महागणपतीच्या मंदिरातील सभागृहात कोंडून ठेवण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच गोळीबार केला गेला.आजही त्या गोळीबाराच्या खुणा तेथे जपल्या गेलेल्या आहेत. तुम्ही कधी जर महागणपतीच्या मंदिरात गेलात तर आवर्जुन सभामंडपाच्या उत्तरेकडील खिडकीचे निरीक्षण करा.  तुमचे लक्ष त्या खिडकीच्या एका गजावर गेल्याशिवाय राहणार नाही.तो गज वेगळया रंगाने रंगवलेला आहे. ब्रिटीश सैन्याने केलेल्या गोळीबारात एक गोळी त्या गजाला घासून गेल्याची खूण तुम्हाला त्या गजावर पहायला मिळेल आणि त्याला स्पर्श केलात तर इतिहासातील एका घटनेचा साक्षीदार झाल्यासारखे वाटून मन रोमांचित होईल.


               दरवर्षी हा जंगल सत्याग्रहाचा दिवस मोठया उत्साहात साजरा केला जातो. मान्यवरांच्या हस्ते येथे उभारलेल्या हुतात्म्यांच्या पुतळयांना व ज्योतिस्तंभाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी पोलिस दलाकडून केले जाणारे संचलन आणि त्यानंतर झाडल्या जाणा-या गोळीबाराच्या तीन फैरी अंगावर शहारा उठवून जातात आणि आपोआपच तोंडातून हुतात्म्यांच्या जयजयकाराच्या घोषणा बाहेर पडतात. पुर्वीपासूनच या कार्यक्रमाला
मोठमोठया नेते , पुढारी , मंत्री अगदी मुख्यमंत्र्यांनीही येथे    उपस्थिती लावलेली आहे. त्याबरोबरच विचित्र योगायोगामुळे एका अंधश्रद्धेलाही जन्म दिला आहे, की जो कोणी या कार्यक्रमासाठी त्याचे पद टिकत नाही. त्यामुळे असेल कदाचित पण हळूहळू येथे येणा-या मोठया पाहुण्यांची संख्या कमी होत गेली, मात्र जनमानसांतील या
कार्यक्रमाबाबतचा आदर अजूनही तसाच असल्याचा दिसतो.
        याचबरोबर या कार्यक्रमात जरा आजूबाजूला पाहिलेत तर या जमलेल्या गर्दीतून वाट काढत, थोडेसे अंग चोरत जाणारे काही आदिवासी लोक तुम्हाला दिसतील. काहींचे नवे पण पारंपारिक पोषाख,  हातात ढोल-ढोलकीसारखी पारंपारिक वादये घेऊन जाणारे हे लोक सुद्धा जंगल सत्याग्रहाच्या हुतात्म्यांना वंदन करायला मूळ आक्कादेवी कातकरवाडीवर जात असतात. तेथील स्मारकाच्या साक्षीने आजूबाजूच्या रानसई , भु-याचीवाडी, वांधणेवाडी,वेश्वीवाडी ते पेण तालुक्यातील वेगवेगळ्या कातकरवाडीवरचे लोक आपल्या समाजातील हुतात्मा नाग्या कातकरी यांना मानवंदना देण्यासाठी जमतात. नाच-गाणी सामुदायिक भोजन अशाप्रकारे हा कार्यक्रम ते साजरा करत असतात, अगदी चिरनेरच्या दिमाखदार सोहळयापेक्षाही हा पारंपारिक सोहळा हटके असला तरी आपला आब राखून आहे. मग येताय ना 25 सप्टेंबरला चिरनेरला...????

प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण रायगड
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com

Monday, September 16, 2019


साखरचौथ
भारतीय सौर वर्षातील बारा महिन्यांपैकी अकरा महिन्यात येणार्‍या शुद्ध पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते . परंतु भाद्रपद महिन्याच्या शुद्ध आणि कृष्ण पक्षातील दोन्ही चतुर्थींना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.  शुद्ध पक्षात येणा-या चतुर्थीला 'गणेश चतुर्थी' ' म्हणूनच ओळखले जाते. गणेशोत्सव हा तर आपल्या सर्वांना आवडणारा असा सण आहेच,पण त्यानंतर कृष्ण पक्षातील येणारी चतुर्थी ही सुद्धा वर्षातील सर्वांत जास्त महत्त्व असलेली चतुर्थी आहे. या चतुर्थीला 'साखर चौथ' म्हणून ओळखले जाते.अकरा किंवा एकवीस संकष्टीचे व्रत  यावर पूर्ण करतात.
            साखर चौथ विशेष लक्षात राहण्याचे आणि तिचे वेगळेपण जाणवण्याचे कारण म्हणजे या चतुर्थीला केली जाणारी पूजा हेच आहे. इतर सर्व संकष्टीच्या वेळी दिवसभराचा उपवास रात्री घरातच हळदी-कुंकवाचा 'कणा' (रांगोळी) काढून त्यावर पाट ठेवून ,पाटावर नवा किंवा स्वच्छ कापड टाकून पानसुपारीचा विडा ठेवून पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन करून सोडतात, पण साखरचौथीचे पूजन मात्र घरासमोर तुळशी वृंदावनाजवळ , ओटी-ओसरीवर पाट ठेवून दोन्ही बाजूला तेरडे मांडून विडयाचे पूजन करून करतात.तसेच इतर महिन्यातील संकष्टीला ऊकडीचे मोदक करा अथवा नका करू पण साखरचौथीला मात्र ते करावेच लागतात त्या मोदकांंपैकी किमान एक किंवा पाच मोदक नारळाची चव भरण्या ऐवजी नुसती साखर घालून तयार करून तयार करतात. कोकणात मात्र साखरेचे मोदक करतात आणि एक मोदक मिठाचा बनवतात. उपवास करणारा एक एक करून मोदक खातो ,मिठाचा मोदक आला की खाणे थांबवून तेवढयावरच उपवास सोडत असतो.... मग पहिलाच मोदक मिठाचा मिळाला तर तेवढेच खाऊन थांबावे लागते. निरांजनाऐवजी दिवे सुद्धा तांदळाच्या पिठाचे म्हणजे ऊकडीचेच. पूजा,  नैवेद्य , आरती हे सर्व करायचे मग चंद्रदर्शन करून उपवास सोडायचा.
          साखरचौथीच्या व्रताबाबत काही लिखित पुरावे आढळत नाहीत.विशेषत: कोकणात कुटूंबाचा एक गणपती असे तेव्हा कुटूंबातील कोणी नवस बोलला आणि पूर्ण झाला तर त्याप्रित्यर्थ किंवा घरातील सोयरसुतकामुळे तो साखरचौथीच्या दिवशी देव बसवत असे . तर काहींच्या मते या साखरचौथीच्या व्रताची कथा सांगितली जाते की, हरिश्चंद्र राजाच्या राज्यात एक कुंभार राहत होता. तो जेव्हा जेव्हा त्याची भट्टी जिला आवा म्हणतात ती लावली की नेहमी भांडी कच्चीच राहत. त्याने एका मांत्रिकाला उपाय विचारला असता बळी देण्यासाठी सांगितले . कुंभाराने एका मृत ऋषीच्या मुलाचा बळी दिला. पण दुसऱ्या दिवशी तो मुलगा जिवंत खेळताना बघून तो घाबरला व राजाकडे जाऊन आपल्या पापाची कबुली दिली. राजाने चौकशी केली असता त्या दिवशी नेमकी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी होती व मुलाच्या आईने हे व्रत ठेवले होते. त्यामुळे मुलगा वाचला होता.
      हळूहळू सगळीकडे या दिवशी गणपती बसवायला सुरुवात झाली. गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तयार झाली.या मंडळांमार्फत नाचाचे म्हणजेच शक्ती - तु-याचे जंगी सामने आयोजित केले जात असत. विशेष म्हणजे हे सामने शेवटपर्यंत पाहण्याचे किंवा शेवट कसा होतो हे जाणून घेण्याचे भाग्य काही लाभले नाही .जेवढे हे सामने पाहिले तेवढयांचा एकच क्रम पहायला मिळत असे तो म्हणजे सुरवातीला देवांची स्तवने , नंतर "श्रावण बाळ जातो काशीला...." यासारखी आख्यायिकांची गाणी,  पुढे पौराणिक प्रश्नोत्तराच्या स्वरुपातील गाणी, त्यातून शाब्दिक वाद आणि शेवटी दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये मारामारीआणि प्रेक्षकांची पळापळ  हे ठरलेले असायचे. रात्री पाऊस नसेल तर खेळ,  छोट्या छोट्या स्पर्धा ,व्हिडिओवर एकाच रात्रीत तीन ते चार सिनेमे असा भरगच्च कार्यक्रम असायचा. दिवसभर लाऊडस्पीकरवर गाणी वाजवली जात असूनही तसा त्रास कुणालाही होत नसे उलट सगळीं ती गाणी आवडीने ऐकत. कारण यामध्ये  प्रल्हाद शिंदेंची गाणीच जास्त असत, नंतर आनंद-मिलिंद शिंदेंची गाणी असत. बहुतेक गाणी भक्तीगीते असत. याला अपवाद फक्त आनंद शिंदेंचेच "जवा नवीन पोपट हा..... " आणि हसन जहांगीरचे "हवा हवा खुश्बू लूटा दे..." यासारख्या मोजक्या गाण्यांचा. ही गाणी त्यावेळी जळी -स्थळी म्हणावी इतकी सगळीकडेच वाजवली जात.याच गाण्यांवर रेकॉर्डडान्स करण्याचाही रेकॉर्ड झाला असेल.
         साखरचौथीचे गणपती आणि उरण तालुक्यातील मोठीजुई गाव हे कायमच आठवणीत राहणारे सूत्र आहे कारण आम्हाला तरी साखरचौथीचे गणपती असतात हे पहिल्यांदाच माहित झाले ते या गावामुळेच. फक्त दिड दिवसाच्या उत्सवासाठी चार-पाच चित्रांचे देखावे आणि मोठया उत्साहात होणारी विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी गावोगावचे लोक मोठ्या संख्येने येत असत. नंतर वैयक्तिकपणे साखरचौथीचे गणपती गावोगावी बसू लागले . पण या सगळ्यात मूळ साखरचौथीचे मूळ स्वरूप मात्र विस्मरणात जायला लागले . तेरडे मांडून केली जाणारी पूजा कमी कमी होत चालली आहे, त्याऐवजी गणपती दर्शन घेऊन उपवास सोडणा-यांची वाढली व चंद्रोदय होईपर्यंत थांबणा-यांची संख्या रोडावत चालली.काळानुरुप बदल होत गेले पण मनातील भाव तेच राहिले.गणेशोत्सवानंतर बाप्पा गेले तरी ते लगेचच येणार ही भावना आजही सुखावते आहे.
       प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण - रायगड
मो.8097876540
email- pravin.g.mhatre@gmail.com

Saturday, September 7, 2019

*आठवणीतला गणराया*
आठवणीतले सारेच काही आठवावेसे वाटते असे नाही ,पण काही आठवणी म्हणजे फक्त आठवणीच नसतात. तर त्या साठवणीतल्याही असतात........
गणपती उत्सवातल्या ब-याच आठवणी अशाच कायमस्वरुपात साठवणीत ठेवलेल्या आणि आता फक्त आठवणीच राहिलेल्या.......
पावसाळा सुरू झाला की ,गावाकडे शेतीच्या कामांची सुरूवात व्हायची आणि आमची शाळाही सुरू व्हायची .घरच्यांना आमच्याकडे बघायलाही वेळ नसायचा .पेरणी(पईरनी),नांगरणी, रो, पाऊस, आवन,आवणी ,बेननी या शब्दांभोवती अन् कामांभोवती त्यांचे दैनंदिनी फिरायची .मग काय हम तो अपने मन के राजा बनके रहने लगते . मग एकदा ऑगस्ट आला की सोबत श्रावणही यायचाच .मग काय सुट्टयाच सुट्टया नागपंचमी ,रक्षाबंधन,गोपाळकाला, पिठोरी अमावास्या करता करता आलेच की गणपती.......
गणपती जवळ आल्याची चाहूल लागायची ती पहिल्यांदा बाबा भाताच्या दलालांना बोलवून घरातल्या कणग्यात जिकिरीने राखून ठेवलेल्या भाताची विक्री करायचे तेव्हा , कारण त्या पैशातूनच आमचा गणेशोत्सव साजरा होणार असायचा. आमचे कपडे (घरात लग्न वगैरे नसेल तर ,जे वर्षातून एकदाच मिळायचे ),ऊत्सवाच्या वाणसामानाची खरेदी हे सर्व याच बेगमीवर निभावून न्यायचे असे.अर्थात आम्हाला हे काही कळत नसायचेच .पण आता गणपती येणार ,आपली मज्जा होणार ,याची मात्र खात्री व्हायची.
          वाट पाहतापाहता तो दिवस जवळ यायचा .घराच्या वरच्या माळयाची सफाई व्हायची ,ब-याचवेळा तेव्हा आमचे बरेचसे गडे हुए खजाने बाहेर यायचे.वर्षभर न सापडलेला बॉल ,खेळणे वा इतर काहीनाकाही हाती लागायचेच.माळयावर ठेवलेली मखराची लाकडी फ्रेम खाली यायची.त्यावर मागील वर्षीचे राहिलेले फाटके कागद परत परत फाडायला कोण गंमत वाटायची. ती फ्रेम घेऊन दूधबावीवर(नाव दूधबाव म्हणजेच दूधाची विहीर, पण पाणी मात्र हिरवंगार असलेला हा पाण्याचा खड्डा) जायचे.तेथे मस्त पाण्यात फुगल्यावर उरलेसुरले कागद निघून ती स्वच्छ व्हायची. हया कामातसुद्धा आमची लुडबुड ठरलेलीच असायची आणि बाबांची एक तरी डरकाळी ठरलेली असायचीच. इकडे घराला चुना लावण्याची साग्रसंगीत तयारी झालेली असायची. सुका चुना एकीकडे पत्र्याच्या डब्यात टाकून पाणी टाकल्यावर गरमगरम ऊकळता चुना पहायला जवळ जावेसे वाटायचे तर दुसरीकडे मोठयांपैकी कोणीतरी ओरडणारच याची खात्री असल्याने इथे मात्र आस्मादिक सुरक्षित अंतर राखून असणार. त्याचवेळी चिकट शिरसाचे तुकडे ऊकळवून त्याचा पातळ गोंद बनवण्याच्या कामाला कोणीतरी लागलेले असायचे.हाच शिरस चुन्यात मिसळयावर चुना भिंतीला घट्ट लागायचा .अंगाला , कपडयांना लागत नसे, शिरस नसेल तर जेथे जेथे तुमच्या पावन शरीरावयवाचा स्पर्श होणार .तो निळसर पांढ-याा रंगाचा शिक्का घेऊन येणे अपरिहार्य असे.
            गणेशचतुुर्थीच्या आदल्या रात्री मखर करायला सुरूवात करायचो. मखर करायचे म्हणजे काय तर रेडिमेड लाकडी फ्रेम दो-याने बांधायचे . दरवाजाकडची फ्रेम खाली पुर्वी पामोलीन तेलाचे येणारे पत्र्याचे दोन डबे घालून बांधावे लागे .नाहीतर मखरात जाता येता डोक्याला मखराचा प्रसाद मिळायचाच.कागद चिकटवण्यासाठी खळ म्हणजे गव्हाच्या पिठात पाणी घालून शिजवून केलेली खीर किंवा साबुदाण्याची पेज तयार झाली की कामाला सुरवात ......
मखराच्या चौकटीला कागद चिकटवायचे काम आम्हाला दिलेले असायचे.त्यावर फिनिशिंग साठी पटयांची फित लावली की,झाल मखर तैयार अर्थात या सगळ्या कामाकडे बारीक नजर ठेवून इतर मोठे असायचेच. मग हा कागद इथे नको तिथे लाव ,या चौकटीत हया रंगाचा कागद का लावला , तो कागद सैल लागला ,हा फाटेल बघ , ती फित वाकडी कशी लावला...अशा एक ना अनेक सूचना मिळत रहायच्या  आणि  आमचे सैन्य त्याबरहुकूम आदेशाचे पालन करत रहायचे .कधीकधी चिडायचो सुद्धा मग बाबांचा कोणालातरी  'चहा बनवा रे' असा आदेश मिळायचा आणि आम्ही खुश्श ! कारण चहाची तल्लफ तर आलेलीच असायची व तशी एनर्जी साठी आमचे हे फँमिली ड्रिंक तासा-दोन तासाला सगळयांनाच हवे असायचेच. रात्री साडेअकरा बारापर्यंत काम पूर्ण व्हायचे मग पुन्हा चहा घ्यायचा , साबुदाण्याची पेज जादा बनवून ठेवलेली शिल्लक असेल तर साखर टाकून ती पण खायची .पण मोजूनमापून बरोबर  अंदाज घेऊन सर्व  सामान खरेदी केलेले असल्यामुळे तशी ती शिल्लक  नसायचीच. काम ऊरकले की लाईटिंगची जोडणी करायची ,म्हणजे मधोमध एक बल्ब आणि आजूबाजूला छोटया बल्बचे तोरण (हे पूर्वीचे Made in India  बरं का अगदी वर्षानुवर्षे चालणारे आजच्या सारखे युज अँड थ्रो China made नाही)....अशाप्रकारे झाले आमचे ईको फ्रेंडली , स्वस्त नि मस्त , मजबूत मखर तैय्यार !
        मखर झाल्यावर बाकीच्यांची झोपायची तयारी सुरू व्हायची ,कारण सकाळी ऊठून पूजन ,नैवेदय, प्रसाद, जेवण याची तयारी करायची असायची.पण आम्ही मुले शेजारच्या घरांघरांत डोकावून , हाका मारून कोणाकोणाचे मखर तयार झाले याचा आढावा घेत असू व 'झाले काय रे ' विचारत  फिरायचो. कोणाला मदत हवी असेल वानरसेना कामाला लागायची. मग कुणाला तरी पारबतीच्या फुलांची आठवण यायची....नाही ही कुठली वेगळयाप्रकारची फुले नाहीत, तर प्राजक्त म्हणजे पारिजातकाची फुले आम्ही त्याला पारबती (पार्वती चा अपभ्रंश) म्हणायचो. गावात एकच ते झाड होते, तेही वरच्या आळीत  बाळू जगेंच्या दुकानामागे आणि अशा ठिकाणी की जिथे भुताडकीसारखे धन निघते असे सांगतात तिथे ! अशा ठिकाणी रात्री बारानंतर जायचे ??? .पण जायचेच ठरले की जाणारच. गुपचुप जाऊन फुले गोळा करून आणायची  झाडाची मालकीण ओरडणार कारण रात्रभर कोणीनाकोणी जाऊन काठीने झाड हलव, दगड मारून फुले पाड असे उदयोग करायचे त्याचा त्रास व्हायचा. फुले आणली की मग मात्र मस्त ताणून दयायची आणि सकाळी ऊठायला मग उशीर झाला की कोणीतरी रागावल्यावरच उठणे होत असे.
             आहा!!  तो दिवस आला, ज्याची वाट वर्षभर पहात होतो .तो दिवस अर्थातच 'गणेश चतुर्थी ' चा .आनंदाचे डोही आनंद तरंग......खुश ! खुश !! खुश !!! अगदी त्रिवार खुश्श !!!. तशी दिवसाची सुरूवात तेवढी खुशीने होत नव्हतीच ,कारण आदल्या दिवशी केलेली मेहनत व जागरण यामुळे अजून झोपून रहावेसेच वाटत असायचे , पण ऊठणे क्रमप्राप्तच असायचे .घरात सगळयांची लगबग सुरू असायची अशावेळी अस्मादिक मध्येच रस्ता अडवून लोळत पडलेले असायचे . त्यामुळे जाता येता ऊठवण्याचा प्रयत्न सुरू असायचा .पण झोपेचा अंमल असल्याने  ऊठायचे नाव नाही..मग काय ..बाबांची एक डरकाळी आणि आम्ही खाड्कन ऊठून सरळ दात घासायला, मशेरी शोधायला. टुथब्रश नसायचाच कोलगेट पावडर हातावर घेऊन बोटांचा ब्रश दातांवर चालून जायचा .पण त्याही पेक्षा आवडते दंतमंजन होते ते म्हणजे 'चंचला' दंतमंजन .छान गोड चव होती आणि मला खूप आवडायची.दात घासून आंघोळ करून नविन कपडे घालायची घाई व्हायची. बरं ते घातल्यावर मान एकदम ताठ व्हायची ...नविन कपडे घातले म्हणून नव्हे तर शर्टची काँलर एवढी मोठी आणि कडक असायची की एकवेळ चिलखत घातलेला सैनिक आरामात आजूबाजूला पाहू शकत असेल पण आम्ङी मात्र डाव्या आणि उजव्या बाजूला मिळून कसेबसे 150 ते160 अंशातच पाहू शकत असू ,बाकी थोडे मागे पहायचे असेल तर मात्र अबाऊट टर्नच करावे लागे.
         पूजेसाठीच्या साहित्याची जमवाजमव झालेली असायची .सकाळी लवकर जाऊन बहिणीने 'पत्री' आणलेली असायची.गणपतीची एकवीस पत्रीच हवी असा अट्टाहास तेव्हा नसायचा.काही तेरडे, नागवेल(कळलावी/अग्नीशिखा),नारलीचा वेल, तुळशीपत्र, लव्हाळा,आदल्या दिवशी कातकरी केवडा विकायला यायचे त्याची एक पात असे काही उपलब्ध होती तेवढे प्रकार जमले तरी बस असायचे .नसतील तर आजूबाजूचे कुणीतरी मागायला येणार किंवा दयायला तरी येणार ,हे शेयरींग चालायचे. इकडे बाबांचे घरातून ओटीवर ओटीवरून घरात ,मखरात ,परत ओटीवर अशा फे-या मारणे सुरू झालेले असायचे ,कारण अजून गणपतीच आलेला नसायचा. आमच्या घरी मुर्ती खोपटयाचे प्रसिद्ध मुर्तीकार एकनाथ पेंटर य़ांच्याकडून यायची (नंतर त्याचे सुपुत्र व आता नातू) . ती आम्हाला आणायला जायला लागत नसे तर तेच एक माणसाकरवी पाठवून देत असत. थोडयावेळाने  मुर्ती घेऊन येणारा /येणारी यायची .आईने भाकरतुकडा ओवाळून त्यांच्या पायावर पाणी घालून झाल्यावर गणेशाचे घरात पदार्पण व्हायचे आणि मग मात्र आमच्या हालचालींवर कडक बंधने यायची .सर्वांना मुर्ती पहायची अनिवार ईच्छा असायची पण बाबा आम्हाला दहा हात दूर ठेवायचे,कारण तेव्हा मुर्ती आजच्यासारखी पीओपीची नसून शुद्ध शाडूची असायची त्यामुळे काही अमंगळ घडू नये म्हणून जपून हाताळावी लागे.इतक्या वेळात संबंधित माणसाचे चहापाणी झालेले असायचे .मग त्याची बिदागी,गणपतीचा शिधा(तांदूळ),विडा देउन तो गेला की बाबा दादाला हाक मारत.दादा येऊन सावकाश  मुर्तीवरचा सुताने बांधलेला  वर्तमान पत्राचा कागद काढायचा (आजही तेच घडते ,फक्त ओरडणा-याची जागा आता मी घेतली आहे) मग सर्व उत्सुकतेने जमलेल्या सर्वांना गणरायाचे दर्शन घडायचे .सगळे खुश असायचे ...आणि कोणीतरी म्हणायचे गेल्यावर्षीपेक्षा थोडी मोठी वाटते मुर्ती.बाबा किंवा दादा लगेच काडी किंवा सूताने उंची,रूंदी चेक करायचे व घरातल्या गणपतीच्या. मुर्तीकडे जायचे ....हो आमच्या घरी दोन गणपती असतात,
कारण आमच्या घरी एक आगळी वेगळी परंपरा आहे. दरवर्षी ऩविन येणारा बाप्पा कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस तर कुणाकडे अकरा दिवस असतो .पण आमच्या घरी मात्र तो अकरा दिवस मखरात तर पुढचे वर्षभर घरात भिंतीत बनवलेल्या काचेच्या कपाटसदृश्य मखरात वास्तव्यास असतो.गणेश चतुर्थीला या वर्षभर राहिलेल्या बाप्पाचे पूजन केले जाते.नविन आलेला बाप्पा फक्त मखरात त्याच्या शेजारी ठेवला जातो.अनंत चतुर्थीला वर्षभर राहिलेल्या व पूजन केलेल्या बाप्पाचे विसर्जन होते व नविन बाप्पा भिंतीतील कपाटात जाऊन बसतो.त्यामुळे लगेच नविन मुर्ती त्या कपाटात बसते की नाही याचा अंदाज घेतला जायचा.पण हमखास अंदाज चुकायचाच....आमचा बाप्पा वाढायचाच परिणामी पुर्वी जेमतेम दोनबाय दोनचे भितीतील कपाट जवळजवळ दरवर्षी मोठे करत करत आज त्याचा आकार एका छोटया मंदिरा एवढा झाला आहे .दोन बाप्पा आता एका मखरातही मावेनासे झाल्याने सध्या नविन बाप्पा सरळ वर्षभराच्या वास्तव्याच्या जागी तर वर्षाचा बाप्पा मखरात विराजमान होतो.असो
         मग दादा गेल्यावर्षीच्या बाप्पाला काढून सावकाश मखरात उजव्या बाजूला ठेवायचा .त्याची व्यवस्थितपणे धूळवगैरे असेल तर झटकून काढायचा आणि नंतर नविन बाप्पाला पुन्हा कागदाने झाकून तो डाव्या बाजूला ठेवायचा.हे झाले की बाबांचा जीव भांडयात पडायचा आणि चहा करायची आँर्डर सुटायची......
               
प्रविण म्हात्रे , पिरकोन
ता.उरण जि.रायगड
8097876540