Wednesday, May 12, 2021

बोर्डाचीच परीक्षा


 कठीण प्रश्न, उत्तर किती कठीण ???


               तो अमिर खानचा *थ्री इडियट्स* सिनेमा आठवतो का ?  अर्थात कोण त्या सिनेमाला विसरला असेल म्हणा !  देशातील एकंदरीत शिक्षणपद्धतीवर बरेच सणसणीत आसूड ओढणारा असाच होता तो सिनेमा. आता तुम्ही म्हणाल यावेळी त्याची आठवण काढण्याचे कारण काय ? त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण त्यातील त्या वीरू सहस्रबुद्धे चे ते पेन तुम्हाला आठवत असेलच. त्यांच्या इंजिनियरींग काॅलेजमधून शिकलेल्या कित्येक तथाकथित हुशार  विद्यार्थी तेच पेन बक्षीस म्हणून मिळवायची स्वप्ने पहात होती.विशेष असेच होते ते पेन कारण अनेक वर्षांच्या संशोधनातून खास अंतराळवीरांना(Astronauts) वातावरण विरहित आणि गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत लिहता येण्यासाठी बनविलेले होते. हीच त्या पेनची खासियत जेव्हा वीरू सहस्रबुद्धे सांगत असतो त्यावेळी रँचो एक साधा सोपा प्रश्न विचारून वीरू सहस्रबुद्धेला निरुत्तर करतो,  आणि तो प्रश्न होता... "सर,अंतराळात लिहण्यासाठी पेन शोधण्यासाठी एवढा प्रचंड खटाटोप अन् संशोधन करण्यापेक्षा त्यांनी पेन्सिलचा वापर का नाही केला ? " 

        विचार करण्यासारखीच गोष्ट आहे की नाही ! एखाद्या प्रश्नाचे उत्तर सोप्या पद्धतीने मिळत असेल तर ते सहज सोपे मिळते म्हणून निरुपयोगी, अर्थहीन समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि वेगळे आणि कठिण उत्तर शोधण्यासाठी काथ्याकूट करत बसायचे. हा कुठला शहाणपणा. नाही म्हणायला larger than life , beyond the limits विचार करणारे असा साधा विचार करतच नाहीत म्हणा.  सुमारे दोनशेच्या आसपास शोध लावणा-या न्युटनने नाही का मांजर आणि तिच्या पिलांना येण्याजाण्यासाठी एक मोठे आणि एक छोटे भोक दरवाजाला पाडले होते. 

        एवढे घडाभर तेल नमनालाच वापरल्यावर एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल आणि तुमच्याही तोंडून थ्री इडियट्स मधील प्राध्यापकांच्यासारखा गोंधळलेला प्रश्न बाहेर पडला असेल की,  "अरे, भाई आखिर कहना क्या चाहते हो..?" सांगतो, सांगतो....  विषय आहे दहावीच्या परीक्षेचा,निकालाचा आणि 'पुढे क्काय्य?? ' या सग्ळयांसमोर उभ्या ठाकलेल्या जागतिक(?) समस्येचा. आधी आॅनलाईन, मग थोडा विरोध झाल्यानंतर आॅफलाईन,  नंतर आॅफलाईनच पण शाळेतच परीक्षा केंद्र ठेवून अशा विविध पर्यायांची चाचपणी करता करता   CBSE बोर्डाने दहावीची परीक्षाच रद्द केल्याने हो-नाही करत अखेर SSC बोर्डाची दहावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. एक प्रश्न सोडवला असे वाटत असतानाच पुढचे काही प्रश्न उपस्थित झाले.  त्यातही सर्वात मोठी अडचण CBSE बोर्डाच्या जेमतेम 9 ते 10% शाळांमध्ये 11 वी 12वीचे वर्ग जोडलेले नसतील. बाकि सर्व शाळांमध्ये ते वर्ग असल्याने त्यांना आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्यात अडचणी वाटली नसावी बहूतेक, पण SSC बोर्डाच्या शाळांमध्ये परिस्थिती नेमकी त्याच्या उलट आहे.  इथे दहावीपर्यंतच्याच शाळा बहुसंख्येने असल्यामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया ही गंभीर समस्या पुढे आली. उपाय म्हणून शाळांनी केलेल्या अंतर्गत  मुल्यमापनवर प्रवेश देता येतील किंवा नाही याबाबत शाळांची मते मागविण्यात आली. याबाबतीतही उत्तर नकारात्मकच आले. 70% शाळा बोर्डाची परीक्षा होणारच या विश्वासावर विसंबून राहिल्याने अंतर्गत मुल्यमापन केलेच नाही.ब-याचशा शाळा तर वर्षभर निष्क्रिय राहिल्याचेच समोर आले. ज्यांनी केले त्यांनीही आॅनलाईन मुल्यमापनाबाबत अविश्वासच दर्शविला. थोडीशी वाट मोकळी करण्याचा प्रयत्न म्हणून अकरावीला 200 गुणांची प्रवेश परीक्षा घेण्याचा विचारही केला. कोरोनाने सर्व वातावरण एवढे अनिश्चित करून ठेवले आहे की, कोणता निर्णय घेतला तरी त्यावर सहमती कमी आणि असहमतीच जास्त प्रकट होते.  करावे तरी काय असा प्रश्न सध्या बोर्ड आणि शासनाला पडला आहे. अगदी त्या गाढव विकायला घेऊन जायला निघालेल्या गंगारामसारखी त्यांची अवस्था झाली आहे.काहीही करा लोकं बोल लावतातच. 

       सर्व जाणकार,  अभ्यासू आणि अनुभवी लोक सोबत असूनही एवढी वर्षे दहावीच्या परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने विनासायास पार पाडणारे बोर्ड आणि शासन सध्या तरी प्रचंड गोंधळलेले आहेत. आता वेळ आली आहे ती घाईघाईने निर्णय जाहीर करण्याची नव्हे तर शांतपणे विचार करण्याची . सर्व पालकांना विश्वासात घेऊन, थोडा धीर धरायची विनंती करून एक दीर्घ मुदतीची उपाययोजना तयार करण्याची ही वेळ आहे. तोपर्यंत या कठिण समस्येवर थोडा काळ सगळयांना धीर धरायला लावणारा एकच निर्णय आहे तो म्हणजे जूनपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली तर अकरावी प्रवेशप्रक्रिया एका छोटयाशा परंतु सर्वसमावेशक अशा पायाभूत( Baseline) चाचणीने (सर्वांना भारदस्त वाटावे म्हणून लागल्यास तिलाCET म्हणा हवे तर पण स्वरूप विद्यार्थ्याला विदयाशाखा निवडण्यासाठी सोईचे पडेल असेच हवे ) पार पाडली जाईल असे स्पष्टपणे सांगून टाकावे.  परिस्थितीत अशीच अनिश्चितता राहिली तरीही हीच प्रक्रिया परीक्षेचे विकेंद्रीकरण करून मर्यादित विदयार्थीसंख्येसह योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडण्याची. यावेळी शाळानिहाय तुकड्यांचे गणित जुळवणे फार महत्त्वाचे ठरेल.  निकषांमध्ये थोडीफार ढिलाई  दयावी लागेल.  पण जर प्रक्रिया मार्गी लावायची असेल तर सगळयात सोपा मार्ग हाच आहे अर्धा मे आणि अर्धा जून मिळून एक महिना पूर्वतयारीसाठी हाती आहे. मला तरी मांजरीसाठी मोठे आणि पिलांसाठी छोटे अशी दोन दोन भोके दरवाजाला पाडण्यापेक्षा एकच मोठे भोक पाडावे असेच वाटते..... बाकी आमची ' सरडयाची धाव कुंपणापर्यंतच..'  आमचे विचार एवढयावरच सिमित आहेत. खोलात जाणा-यांनी अजून समुद्रमंथन करावे. भले मग अमृत निघो वा हलाहल.... ते आपण काळावर सोपवू या 


प्रविण म्हात्रे

पिरकोन,उरण,रायगड

   

1 comment: