Tuesday, May 4, 2021

 शिक्षणाचा (नविन?) अल्गोरिदम 



शेवटी एकदा तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ , सक्तीच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळांची घंटा 27 जानेवारीला वाजली. कोविड-19 बद्दल अतिपरिचयात अवज्ञा अशी काहीशी अवस्था सध्या सर्वांचीच झाली होती. लाॅकडाऊन ते काऊंटडाऊन बिगेन असा परतीचा प्रवास सुरु झाला होता. नाकावरचा मास्क सरकत सरकत आधी तोंडावर अन् नंतर गळयावर येऊन स्थिरावायला लागला होता. एक एक करत वेगवेगळ्या क्षेत्रात हळूहळू चलनवलन वाढू लागले. महसूलाच्या नावाने प्रथम प्राधान्य मदिरालयांना मिळाले.  त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मग सर्वजण आपापल्या परीने सुरूवात करू लागले होते. पण या सर्व पसा-यात मदयालयांना रान खुले झाले असले तरी विदयालयांना मात्र टाळेच लागलेले होते. नाही म्हणायला आॅनलाईन शिक्षणाचे थोडेफार प्रयत्न केले जात होते.परंतु फार थोडे विद्यार्थी या प्रवाहात सामील झाले होते आणि थोडा समावेश असलेले विदयार्थीच फार होते. त्यातच 4जीचे एक पाऊल टाकून 5जीचे वामनाचे पुढचे पाऊल टाकून समस्त भारत पादाक्रांत करण्याचे मनसुबे रचणारे ख-या भारतात अर्थातच ग्रामीण भागात 4जी सोडाच 2जीची रेंजही पोहचवू शकलेले नाहीत. त्यामुळे आॅनलाईन शिक्षणाची लाईन शहरांपुरतीच मर्यादित राहिली होती. आपण कितीही ICT च्या आणि आॅनलाईन शिक्षणाच्या गमजा मारल्या तरी सर्वसमावेशक अशा आॅफलाईन शिक्षणाला पर्याय नाही हे सत्य वारंवार अधोरेखित होत होते. आता हे शैक्षणिक वर्ष संपायला दोन महिने असताना शाळांच्या दरवाजावरचे कुलूप निघाले. काहीशा साशंकतेनेच पण एका वेगळयाच समाधानात विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत पाऊल टाकले.ते टाकलेले पाऊल स्थिरावायच्या आधीच कोरोनाने पुन्हा उसळी मारली. बंद व्हायची पहिली पाळी होती अर्थातच शाळांचीच . जेमतेच चारदोन धडे बालकांनी गिरवले असतील नसतील,पुन्हा ते कुलूप दरवाजा अडवून बसले. 

      एक एक करत सर्व वर्गांच्या परीक्षा रद्द होत गेल्या.आॅनलाईन की आॅफलाईन या साठमारीत दहावीच्याही परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाली आणि अगदी दुसऱ्या दिवसापासूनच सगळयांना चिंता पडली आता अकरावीचे काय???  प्रवेशप्रक्रिया कशी राबवणार. दहावीची परीक्षा न घेता मुलांना अकरावीत घालायचे म्हणजे काय?  कसं होणार बालकांचं!!!   म्हणजे वर्षभर ते मूल जे काही शिकले,  जो अभ्यास- जी मेहनत केली ती कुचकामीच ठरली. कारण काय , तर फक्त त्याने परीक्षा नाही दिली हेच. म्हणजे जर परीक्षा आॅनलाईन झाल्या असत्या तर घरच्यांच्या मदतीने परीक्षेत गुण मिळविले असते किंवा आॅफलाईन झाल्या असत्या आणि प्रत्येक शाळेतच परीक्षाकेंद्र असते(तसे ते ठेवायचे प्रयत्न सुरु होतेच) व वर्षभरात अध्ययन- अध्यापनातील उणीवा पाहता थोडे सैलवातावरण अन् सढळ गुणदान होऊन टक्केवारी राखली असती तर मात्र त्यांचे 'खरे' शिक्षण झाले असते. शेवटी आपण परीक्षार्थीच ना!  की 'परीक्षाजीवी' (?) 

    असो, पण हां हां म्हणता हे शैक्षणिक वर्ष गंगार्पण झाले. जसे आले तसे गेलेही. प्रश्न राहिला तो शिक्षकांचे, शाळेचे तोंडही न पाहता पहिलीचे विदयार्थी दुसरीत गेले. तसेच दुसरीतले तिसरीत.....नववीतले दहावीत गेले. आता पुढचे  वर्ष कधी- कसे सुरू होणार ....अगदी होणार की नाही हे आजच्या घडीला तरी स्पष्ट होत नाही कारण, सप्टेंबरपर्यंत पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याची भविष्यवाणी कुण्या कुडमुडया ज्योतिषाने नव्हे तर नामवंत डाॅक्टरांनीच वर्तवली आहे. मग कसे करणार अध्यापन ? कसे होणार अध्ययन आणि कोणत्या निकषावर करणार मूल्यमापन ?  हे प्रश्न आव्हान बनून समोर उभे ठाकले असताना पारंपरिक पद्धतीने विचार करणे परवडणारे नाही. वर्षभराच्या अंतरानंतर लिखाणातील हाताचे वळण, स्थिरता, अवधान टिकवण्याची क्षमता . एकात्मिकता हया सगळयालाच गंज चढला असेल. मग सुरवात कुठून अन् कशी करायची हा यक्षप्रश्न असेल.  तेव्हा आपल्याकडे असलेली उत्तरे त्या यक्षाचे समाधान करण्यात असमर्थ ठरतील. 

    आता गरज आहे ती शिक्षणाची मूळ चौकट मुळापासून बदलण्याची. तिची नुसती पुनर्रचनाच करून भागणार नाही, तर तिची संपूर्ण बैठकच नव्याने रचावी लागेल. जुने ते सोने हे खरे असले तरी भूक लागल्यावर सोने खाता येत नाही.तिथे भाकरीचा तुकडाच दयावा लागतो.तसेच आधीचे अभ्यासक्रम,पाठयक्रम ,अध्यापन पद्धती कितीही उपयुक्त असल्या तरी वेगळी चाकोरी निवडावी लागेल. संगणकाप्रमाणे शिक्षणाचाही अल्गोरिदम नव्याने तयार करावा लागेल. वाटते तेवढे सोपे नाही हे. पण वेगळा विचार केला तर तेवढे कठीणही नाही. गरज आहे ती प्रयत्नात एकसूत्री, एकमुखी सातत्याची.  धरसोड उपक्रम राबविले तर "तेलही गेले तूपही गेले,हाती धुपाटणे आले " हे निश्चितपणे अनुभवायला मिळणार . मग काय करू शकतो आपण? पहिल्यांदा गरज आहे ती आपल्यातला 'मेकाॅले' हद्दपार करण्याची. आजपर्यंत कितीतरी प्रयत्न झाले .पण हा मेकाॅले आपले अस्तित्व प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे टिकवून आहे. अभ्यासक्रमातील शब्दांचा कीस काढून तयार केलेली उद्दिष्टे साधी सरळ भाषेत निश्चित करावी लागतील. पहिली-दुसरी,  तिसरी ते पाचवी,  सहावी ते आठवी आणि नववी ते थेट बारावी या टप्प्यांमधील अभ्यासक्रमातील एकजिनसी भाग एकत्र करावा लागेल. त्यासाठी पुनर्रचनेची आवश्यकता नाही आणि तेवढा वेळ सुद्धा नाही. फक्त थोडी उलटी गंगा वहावी लागेल.म्हणजे आजपर्यंत तज्ज्ञ अभ्यासक्रम तयार करत आणि तो शाळा, शिक्षकांपर्यंत पोहोचवला जात असे. पण सद्यपरिस्थितीत ग्रासरूट वरून मांडणी करून घेऊन तिचे सार्वत्रिकीकरण केले तर कमी वेळेत ते शक्य होऊ शकेल.  ज्याच्या समस्या त्याचे उपाय हा मार्ग सोईस्कर ठरेल.  अन्यथा राज्याच्या कुठल्यातरी कोप-यात कोणीतरी एखादा प्रयोग यशस्वी केलेला असेल आणि तोच राज्यभर राबवायचा अट्टाहास केला तर स्थानिक समस्या सुटण्याऐवजी अपरिचित अनुभवातून वेगळयाच समस्या तयार होतील आणि बुडत्याचा पाय अधिकच खोलात जाईल.  एकाच फूटपट्टीने सगळयांना मोजण्याऐवजी प्रत्येकाच्या हाती असलेल्या मापाने मोजूदया परिस्थिती नियंत्रणात आली की सार्वजनिक मंथनातून निर्माण झालेले नवनीत सगळयांच्याच पदरात टाकता येईल. बघूया थोडी 'टेढी उँगली' करून मला तर वाटते 'घी जरूर निकलेगा और बर्तन भी सलामत रहेगा'... बाकी विचार करायला तज्ज्ञ(?)  आहेतच की त्यांच्या ज्ञानापुढे आपले विचार(की अविचार) बापुडेच ठरतील....चला उत्तर काळच देईल. तोपर्यंत "घरी रहा,  सुरक्षित रहा!!!!! 


प्रविण म्हात्रे

पिरकोन, उरण, रायगड

No comments:

Post a Comment