परतीचा पाऊस
सकाळपासून दुपारपर्यंत उन्हाचा कडाका एवढा , की अक्षरशः कातडी भाजून काढणे हा शब्दसुद्धा अंगाची काहिली वर्णन करायला कमी पडावा. पाण्याचे शेकडो झरे उमाळे फुटून वाहू लागल्यासारखे वाटावे अशा घामाच्या धारा लागलेल्या .त्या पुसून पुसून हातरूमाल आणि शर्टच्या बाहया संपृक्त अवस्थेला पोहोचलेल्या. चेहरा लालबुंद होऊन त्याची आग-आग होऊ लागलेली. अंगातले कपडे अंगाला घट्ट चिकटून बसलेले. सगळयांच्या तोंडी फक्त सुस्कारे. प्रत्येकजण नुसता हाशहुश्य करत बसलेला. पंख्याखाली बसुनसुद्धा गारव्याऐवजी पंखा वाफा टाकत असल्यासारखा गरमागरम हवा सोडत असलेला. काय करू , कुठे बसू असे प्रत्येकाला झालेले. अशातच आकाशाचा रंग पालटू लागतो. पांढरे कापसासारखे ढग जाऊन हळूहळू काळेकाळे ढग जमा होऊ लागलेले. क्षितिजावर दूर कुठेतरी विजेची रेषा चमकून गायब झालेली दिसू लागते. पावसाची चिन्हे दिसू लागली , की येणाऱ्या गारव्याच्या कल्पनेने जीवाला मनातून गारवा आल्यासारखा वाटतो.
पण शेतावर काम करणाऱ्या शेतक-याच्या मात्र पोटात गोळा उठतो. गेले चारपाच महिने मेहनत केलेले वर्षाचे हाती लागणारे भाताचे पिक आताच कापणी करून शेतात नीटपणे आडवे पसरून ऊन खायला पसरून ठेवलेले असते. ते आता भिजणार या कल्पनेनेच त्याचा जीव वरखाली होऊ लागतो. एकमेकांच्या सुचना देत, कधी रागवत घाईघाईने हात चालायला लागत. काय करावे सुचत नाही .मग मात्र शक्य तेवढया चपळाईने भाताचे भारे बांधायला सुरवात करत. ते तेवढयाच घाईघाईने गावाशेजारी तयार केलेल्या खळयावर आणून त्याचे ऊरवे रचले जाई. आजूबाजूला पडलेला, राखून ठेवलेला हाताला लागेल तेवढा पेंढा त्या ऊरव्यावर टाकून ते झाकून टाकले जात असे. खरंतर पावसापुढे पर्यायाने निसर्गापुढे काही चालणार नाही , याची खात्री असूनही जिवाच्या आकांताने सारी धडपड सुरु होत असे. एकदा का पाऊस सुरु झाला की मग सा-या आसमंताचा नूरच पालटून जायचा. टपटप करत करत मोठमोठाले थेंब पडायला सुरूवात होते न् होते तोच सोबतीला विजेचा चाबूक आणि ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाचा रथ धो धो पाऊसधारांत ऊधळत सगळे चिंबचिंब करून जसा आला तसाच निघून जायचा. आलेले मळभ दूर व्हायचे. क्षितिजाच्या रेषेवर मात्र विज लवलवत आकाशाच्या पाठीवर सळ्कन् रेघोटी मारून गायब होत असते. ढगांआड गेलेला सूर्य आपला मुखडा ढगांच्या आडून बाहेर काढायला सुरुवात करतो. पण तोही आता पिवळयाधम्मक तेजाऐवजी तांबूस-लालसर लालीमध्ये मलूल पडून मावळती जवळ करू लागलेला असायचा. शेतकरी हवालदिल होऊन फक्त चिंताग्रस्त होऊन घरातल्या दो-या सैल झालेल्या बाजेवर बसून विचारात पडलेला असायचा. मती गुंग होणे म्हणजे काय हे त्याची ती अवस्था पाहून सहज लक्षात येत असते. मनातून सारखे वाटत असते की, जावं आणि ती पेंढयाने झाकलेली ऊरवी उघडून नेमके किती भिजले आहे याचा अंदाज घ्यावा.पण लगेचच दुसरे मन वस्तुस्थितीची जाणीव करून देते. संध्याकाळ होत आलेली असते. रविराज आपल्या शयनकक्षाकडे पाऊल पाऊल करत चाललेले असायचे.त्यातही आपण वरचा पेंढा काढला आणि रात्री पुन्हा पाऊस आला तर काय होईल ही सार्थ भिती असायचीच. मग तो रात्रभर तसाच अंथरुणावर पडलेला असतानाच दिवसभराच्या श्रम आणि धावपळीने दमल्यामुळे कधी झोपी जात असे.
दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणे डोंगराआडून वर येण्याआधीच हा खळे गाठायचा. ऊरव्याच्या सर्व बाजूंनी गोलगोल फेरी मारून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत असे. हळूच एका बाजूने वर चढून एक एक करत भाताचे भारे खाली उतरवून घेई . इतर गडीमाणसे येण्यापूर्वीच स्वत: कामाला लागलेला असायचा. डोळयात अश्रू तरळून गेलेले असत, पण हातातोंडाशी आलेले पिक सुरक्षित घरी पोहोचावे हीच मनोमन इच्छा मनातल्या मनात देवासमोर साकडं घालत असे.पुन्हा कालच्या वातावरणाचा प्रत्यय येण्या अगोदर मळणी, ऊफणणी ऊरकून गोणी भरुन ठेवावी असेच वाटत असेल . झोडून जमा झालेला धान्याचा ढीग एकाबाजूला करून थोडे थोडे सुपात भरून वा-याची दिशा पाहून खाली सोडून केर कचरा साफ करून सुंदरसा कंसाकृती कणा आकाराला येत असे. तो उंच उंच बाळसे धरू लागतो. तोच आकाशात काळा काळा कापूस पिंजायला सुरुवात झालेली असायची. मग पुन्हा धावपळ सुरू... घाईघाईने पोती एक लाकडी खोक्याच्या मदतीने ज्याला फरी म्हणतात, त्या फरीनेच भरली जात. मोजमापाचीही अनोखी रीत. दर फरीला पोत्यात भरलेल्या भाताची एक मूठ भरुन बाजूला जमिनीवर छोटीशी रास करायची. प्रत्येक वेळी एक करत करत या राशींच्या उभ्या आडव्या ओळी तयार होत. यातील प्रत्येक राशीला फसकी म्हणतात .सर्व भात भरून झाले की फसक्या मोजल्या जात. मोजताना सुरवात करताना 'एक' या अंकाने न करता पहिली फसकी 'लाभ' व नंतर पुढे दोन,तीन,चार असे. मोजत.एव्हाना आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून थेंब थेंब झरू लागलेले असायचे . सर्व उरकून समाधानाने घर गाठताना पाऊसही आपला बँड-फटाके वाजवत धो-धो कोसळू लागायचा. आता मात्र एक समाधान असायचे, कारण एवढे तरी पिक घरात आलेले आहे.
काही वर्षांपासून मात्र लोकांनी ही धावपळ करणे सोडून दिल्याचे जाणवते.आताशा लोक परतीचा पाऊस पडायची चिन्हे दिसू लागताच जर जवळ मोठी ताडपत्री किंवा मोठा प्लास्टिकचा कागद असेल तर शेतातल्या शेतातच मळणी सुरू करतात. जेवढे शक्य तेवढया वेगाने पिक पोत्यात भरून घरी आणतात. ना कणा ना फसक्या. फक्त पिक आले बस झाले अशीच मानसिकता राहिली आहे. अर्थात ती तरी किती दिवस टिकणार आहे, कारण शेत पिकवणारी जमात लवकरच नामशेष होणार..... शेती जाणार, तिथे मोठमोठे इमले उभे राहणार .....शेतक-याची धांदल उडवून मनात हसणारा परतीचा पाऊस त्या इमल्यांवरही पडणार ,पण तो उघड पहायला कोणीच नसणार. सगळे सुरक्षित बंद काचांआडून त्रयस्थपणे पाहत राहणार.....
पण शेतावर काम करणाऱ्या शेतक-याच्या मात्र पोटात गोळा उठतो. गेले चारपाच महिने मेहनत केलेले वर्षाचे हाती लागणारे भाताचे पिक आताच कापणी करून शेतात नीटपणे आडवे पसरून ऊन खायला पसरून ठेवलेले असते. ते आता भिजणार या कल्पनेनेच त्याचा जीव वरखाली होऊ लागतो. एकमेकांच्या सुचना देत, कधी रागवत घाईघाईने हात चालायला लागत. काय करावे सुचत नाही .मग मात्र शक्य तेवढया चपळाईने भाताचे भारे बांधायला सुरवात करत. ते तेवढयाच घाईघाईने गावाशेजारी तयार केलेल्या खळयावर आणून त्याचे ऊरवे रचले जाई. आजूबाजूला पडलेला, राखून ठेवलेला हाताला लागेल तेवढा पेंढा त्या ऊरव्यावर टाकून ते झाकून टाकले जात असे. खरंतर पावसापुढे पर्यायाने निसर्गापुढे काही चालणार नाही , याची खात्री असूनही जिवाच्या आकांताने सारी धडपड सुरु होत असे. एकदा का पाऊस सुरु झाला की मग सा-या आसमंताचा नूरच पालटून जायचा. टपटप करत करत मोठमोठाले थेंब पडायला सुरूवात होते न् होते तोच सोबतीला विजेचा चाबूक आणि ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाचा रथ धो धो पाऊसधारांत ऊधळत सगळे चिंबचिंब करून जसा आला तसाच निघून जायचा. आलेले मळभ दूर व्हायचे. क्षितिजाच्या रेषेवर मात्र विज लवलवत आकाशाच्या पाठीवर सळ्कन् रेघोटी मारून गायब होत असते. ढगांआड गेलेला सूर्य आपला मुखडा ढगांच्या आडून बाहेर काढायला सुरुवात करतो. पण तोही आता पिवळयाधम्मक तेजाऐवजी तांबूस-लालसर लालीमध्ये मलूल पडून मावळती जवळ करू लागलेला असायचा. शेतकरी हवालदिल होऊन फक्त चिंताग्रस्त होऊन घरातल्या दो-या सैल झालेल्या बाजेवर बसून विचारात पडलेला असायचा. मती गुंग होणे म्हणजे काय हे त्याची ती अवस्था पाहून सहज लक्षात येत असते. मनातून सारखे वाटत असते की, जावं आणि ती पेंढयाने झाकलेली ऊरवी उघडून नेमके किती भिजले आहे याचा अंदाज घ्यावा.पण लगेचच दुसरे मन वस्तुस्थितीची जाणीव करून देते. संध्याकाळ होत आलेली असते. रविराज आपल्या शयनकक्षाकडे पाऊल पाऊल करत चाललेले असायचे.त्यातही आपण वरचा पेंढा काढला आणि रात्री पुन्हा पाऊस आला तर काय होईल ही सार्थ भिती असायचीच. मग तो रात्रभर तसाच अंथरुणावर पडलेला असतानाच दिवसभराच्या श्रम आणि धावपळीने दमल्यामुळे कधी झोपी जात असे.
दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणे डोंगराआडून वर येण्याआधीच हा खळे गाठायचा. ऊरव्याच्या सर्व बाजूंनी गोलगोल फेरी मारून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत असे. हळूच एका बाजूने वर चढून एक एक करत भाताचे भारे खाली उतरवून घेई . इतर गडीमाणसे येण्यापूर्वीच स्वत: कामाला लागलेला असायचा. डोळयात अश्रू तरळून गेलेले असत, पण हातातोंडाशी आलेले पिक सुरक्षित घरी पोहोचावे हीच मनोमन इच्छा मनातल्या मनात देवासमोर साकडं घालत असे.पुन्हा कालच्या वातावरणाचा प्रत्यय येण्या अगोदर मळणी, ऊफणणी ऊरकून गोणी भरुन ठेवावी असेच वाटत असेल . झोडून जमा झालेला धान्याचा ढीग एकाबाजूला करून थोडे थोडे सुपात भरून वा-याची दिशा पाहून खाली सोडून केर कचरा साफ करून सुंदरसा कंसाकृती कणा आकाराला येत असे. तो उंच उंच बाळसे धरू लागतो. तोच आकाशात काळा काळा कापूस पिंजायला सुरुवात झालेली असायची. मग पुन्हा धावपळ सुरू... घाईघाईने पोती एक लाकडी खोक्याच्या मदतीने ज्याला फरी म्हणतात, त्या फरीनेच भरली जात. मोजमापाचीही अनोखी रीत. दर फरीला पोत्यात भरलेल्या भाताची एक मूठ भरुन बाजूला जमिनीवर छोटीशी रास करायची. प्रत्येक वेळी एक करत करत या राशींच्या उभ्या आडव्या ओळी तयार होत. यातील प्रत्येक राशीला फसकी म्हणतात .सर्व भात भरून झाले की फसक्या मोजल्या जात. मोजताना सुरवात करताना 'एक' या अंकाने न करता पहिली फसकी 'लाभ' व नंतर पुढे दोन,तीन,चार असे. मोजत.एव्हाना आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून थेंब थेंब झरू लागलेले असायचे . सर्व उरकून समाधानाने घर गाठताना पाऊसही आपला बँड-फटाके वाजवत धो-धो कोसळू लागायचा. आता मात्र एक समाधान असायचे, कारण एवढे तरी पिक घरात आलेले आहे.
काही वर्षांपासून मात्र लोकांनी ही धावपळ करणे सोडून दिल्याचे जाणवते.आताशा लोक परतीचा पाऊस पडायची चिन्हे दिसू लागताच जर जवळ मोठी ताडपत्री किंवा मोठा प्लास्टिकचा कागद असेल तर शेतातल्या शेतातच मळणी सुरू करतात. जेवढे शक्य तेवढया वेगाने पिक पोत्यात भरून घरी आणतात. ना कणा ना फसक्या. फक्त पिक आले बस झाले अशीच मानसिकता राहिली आहे. अर्थात ती तरी किती दिवस टिकणार आहे, कारण शेत पिकवणारी जमात लवकरच नामशेष होणार..... शेती जाणार, तिथे मोठमोठे इमले उभे राहणार .....शेतक-याची धांदल उडवून मनात हसणारा परतीचा पाऊस त्या इमल्यांवरही पडणार ,पण तो उघड पहायला कोणीच नसणार. सगळे सुरक्षित बंद काचांआडून त्रयस्थपणे पाहत राहणार.....
प्रविण म्हात्रे
पिरकोन- उरण- रायगड
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com
पिरकोन- उरण- रायगड
मो.8097876540
email - pravin.g.mhatre@gmail.com



